Thursday, October 14, 2010

श्री समर्थांनी सांगितलेली चातुर्य लक्षणे

चातुर्य लक्षणे सांगताना श्री समर्थ म्हणतात :
रूप लावण्य अभ्यासिता न ये । सहजगुणास न चले उपाये । काही तरी धरावी सोये । अगांतुक गुणांची । । १४-६-
काळे माणूस गोरे होयेना । वनाळास यत्न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण । । १४-६-२
आंधळे डोळस होयेना । बधिर ते ऐकेना । पांगुळ पाये घेईना । हा सहजगुण । । १४-६-३
आईवडीलांकडून मिळालेल्या शरीराचे रूप आपल्याला पालटता येत नाही कारण ते जन्म जात असते .म्हणून अभ्यासाने मिळवता येणारे अगांतुक गुण माणसाने आत्मसात करायला हवे असे समर्थ सांगतात .अवगुण सोडता येतात .उत्तम गुण आभ्यासाने मिळवता येतात ।
अवगुण सोडिता जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती । कुविद्या सांडूनी सिकती । शहाणे विद्या । । १४-६-५
उत्तम गुणांचे महत्व सांगतांना समर्थ म्हणतात :
देहे नेटके शृंघारिले । परी चातुर्येविण नासले । गुणेविण साजिरे केले । बाष्कळ जैसे । । १४-६-९
अंतर्कळा शृंघारावी । नानापरी उमजावावी । संपदा मेळवूनी भोगावी । सावकास । । १४-६-१०
जर शरीराला शृंघारिले पण अंगी चातुर्य नसेल ,शहाणपण नसेल तर ते वाया जाते .म्हणून माणसाने आपले अंतर्मन उत्तम गुणांनी सजवावे .ते ज्ञानाने भरावे ,शहाणपण ने भरावे ,त्या गुणांच्या जोरावर समाजात मान मिळवावा .उत्तम गुणांनी युक्त असल्याने संपत्तीही मागून येते ।
चतुर माणसाला माहीत असते की दुस-या बरोबर कसे बोलावे ,कसे वागावे ,कारण आपण दुस-याला त्रास दिला तर आपल्यालाही त्रास सोसावा लागतो .त्याला माहीत असते की जी गोष्ट अनेकांना पसंत पड़ते ,तिचा प्रसार अनेकां मध्ये होतो । दुस -याला समाधान दिले तर आपल्याला समाधान होते .कारण आपण दुस-याला अरे म्हटले तर दूसरा कारे म्हणणारच ! मग कसे वागावे ते समर्थ सांगतात :
तने मने झिजावे । तेणे भले म्हणोंन घ्यावे । उगेची कल्पिता सिणावे । लागेल पुढे । । १४-६-२१
शरीराने मनाने लोकांसाठी झिजले तर भलेपणा मिळतो .लोकांचे कार्य अडून राहिल्यास त्यांना मदत केली तर लोक त्याच्या कड़े येतात .चतुर माणसाला कळते की जो दुस -याला सुखी ठेवतो ,तो सुखी होतो .जो दुस-याला सुखी ठेवतो तो सुखी होतो .आळसाने काय होते ते समर्थ सांगतात :
आळसे कार्यभाग नासतो । साक्षेप होत होत जातो । दिसते गोष्टी कळेना । शहाणा कैसा । । १४-६-२७
मित्री करिता होते कृत्य । वैर करिता होतो मृत्य । बोलिले हे सत्य की असत्य । वोळखावे । । १४-६-२८
आपणास शहाणे करू नेणे । आपले हित आपण नेणे । जनी मित्री राखो नेणे । वैर करी । । १४-६-२९
ऐसे प्रकारीचे जन । त्यांस म्हणावे अज्ञान । तयापासीँ समाधान । कोण पावे । । १४-६-३०
जेव्हडा व्याप तेव्हडे वैभव असते ,म्हणून कोणतेही कार्य आळशीपणाने केले तर ते नासते .पण प्रयत्न चालू ठेवले तर हळूहळू कार्य सिध्दीस जाते .मैत्री केल्याने कार्य सिध्दीस जाते ,वैर केल्याने नाही .जर लोकांशी स्नेह राखता आला नाही ,तर अशा लोकांना समर्थ अज्ञानी म्हणतात .त्यांच्या जवळ समाधान रहात नाही .तो एकटा एक राहतो .तो सर्वांशी भांडला तर त्याला यश मिळत नाही .म्हणून समर्थ म्हणतात :
बहुतांचे मुखी उरावे । बहुतांचे अंतरी भरावे । उत्तम गुणी विवरावे । प्राणीमात्रासी । । १४-६-३२
शाहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्ये भगवत भजन । वाढवावे । । १४-६-३३


हरिकथा कैसी करावी ?

मागां हरिकथेचे लक्षण । श्रोती केला होता प्रश्न । सावध होउन विचक्षण । परिसोत आता । । १४-५-१
हरिकथा कैसी करावी । रंगे कैसी भरावी । जेणे पाविजे पदवी । रघुनाथ कृपेची । । १४-५-२
हरिकथेचे लक्षण कोणते असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता .त्याला उत्तर देतांना समर्थ म्हणतात :
हरिकथा कशी करावी ,तिच्यात रंग कसा भरावा ,म्हणजे त्या कथेने भगवंताची कृपा संपादन करता येईल ,तशी योग्यता प्राप्त होईल ते आता सांगतो .जसा सोन्याला सुगंध प्राप्त झाला ,उसाला गोड मधुर फळे लागली तर अपूर्व योग येईल त्याप्रमाणे :
तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । वित्पन्न आणि वादरहित । तरी ते ही अपूर्वता । । १४-५-४
रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी । निराभिमानाने वर्ते जनी । तरी ते ही अपूर्वता । । १४-५ -५
हरिदास असून विरक्त ,मोठा ज्ञानी असून प्रेमळ भक्त ,,मोठा विद्वान् ,उत्तम रागज्ञान ,वाद शून्य कीर्तनकार ,उत्तम तालज्ञान ,सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून अंगी ब्रह्मज्ञान असलेला लोकांशी वागताना निराभिमानी असणारा हरिदास असेल तर तो अपूर्व योग असतो .याशिवाय :
मछर नाही जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी । चतुरांग जाणे मानसी । अंतर्निष्ठ । । १४-५-६
ज्याला द्वेष ,मत्सर नसतो ,संतांना जो अत्यंत प्रिय असतो ,,ज्याच्या अंगी चौफेर ज्ञान असते ,भगवंतावर पूर्ण निष्ठा असते ,असा हरिदास उत्तम असतो ।
उत्तम हरिकथा कशी करावी ते समर्थ सांगतात :
कथा रचायाची खूण । सगुणी जाणावे निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा । । १४-५-१४
देवाचे वर्णावे वैभव । नाना प्रकारे महत्त्व । सगुणी ठेवूनिया भाव । हरिकथा करावी । । १४-५-१५
लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची । नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी । । १४-५-१६
येकांची कीर्ती येकापुढे । वर्णिता साहित्य न पड़े । म्हणोनिया निवाडे । जेथील तेथे । । १४-५-१८
मूर्ती नस्तां सगुण । श्रवणी बैसले साधूजन । तरी अद्वैत निरूपण । अवश्य करावे । । १४-५- १९
नाही मूर्ती नाही सज्जन । श्रवणी बैसले भाविक जन । तरी करावे कीर्तन । प्रास्ताविक वैराग्य । । १४-५-२०
सगुण सांगताना निर्गुण आणू नये.श्रोत्यांचे गुण दोष काढू नये .देवाचे वैभव वर्णन करावे .देवाचे महत्त्व वर्णन करावे .सगुणाचा भाव ठेवून हरिकथा करावी .लोकांची लाज सोडून ,धनाबद्दल प्रेम न बाळगता ,नवनवीन विषयांवर कीर्तने करावी .एका देवापुढे दुस-याचे महत्त्व सांगू नये .रामाच्या देवळात कृष्ण कथा सांगू नये .निर्गुण साधना करणारे साधू समोर असताना सगुण न सांगता अद्वैताचे निरूपण करावे .भाविकांसमोर प्रपंचा बद्दल अनुताप व वैराग्य सांगावे ।
हरिदासाने काय करू नये ?
कीर्तनात स्त्रियांच्या सौंदर्या विषयी बोलू नये .नाहीतर श्रोत्यांच्या मनात कामवासना निर्माण होते व त्यांचा संयम सुटतो .साधकाला जे बाधते ,ते ते हरिदासाने टाळावे .हरिदासाला जरी रागज्ञान ,स्वरज्ञान चांगले असेल तरी त्या नादात जर तो भगवंताला विसरत असेल तर ते त्याच्या कथेत आलेले विघ्न आहे असे मानता येते ।
शेवटी हरिदास केव्हा धन्य समजावा ते समर्थ सांगतात :
मन ठेवूनी ईश्वरी । जो कोणी हरिकथा करी । तोचि ये संसारी । धन्य जाणावा । । १४-५-३७
जो मनामध्ये ईश्वरा विषयी भाव ठेवून हरिकथा करतो तो धन्य समजावा .नित्य नवीन कथा लोकाना ऐकवण्याची त्याला आवड असते .जेथे जेथे हरिकथा चालू असते तेथे तो धावून जातो .असा हरिदास धन्य असतो .

Tuesday, October 12, 2010

श्री समर्थांची भिक्षेबद्दलची संकल्पना

भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला । प्रतिग्रहा वेगळा जाला । भिक्षा मागता । । १४-२-२
श्री समर्थांना भिका-याने मागितलेली भिक्षा अभिप्रेत नाही । लाचारी ,दीनपणा त्यात त्यांना अपेक्षित नाही .पैसे कष्टाने मिळवून पोट भरण्याची ताकद असूनही जर एखादा भगवंत प्राप्ती साठी,आपल्या ध्येयासाठी दारिद्र्य पत्करत असेल तर लोकांकडे मागुन खाल्लेल्या अन्नाला भिक्षा असे नाव समर्थ देतात .समर्थ म्हणतात :
ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा । ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे । । १४-२-४
दत्त गोरक्ष आदिकरूनी । सिध्द भिक्षा मागती जनी । निस्पृहता भिक्षेपासूनि । प्रगट होये । । १४-२-५
दत्त ,गोरक्ष ,समर्थ यांसारखे साधनी लोक ध्यान धारणेत रमायला लागल्यावर त्यांना त्यांच्या देहाचाही विसर पडतो .अशा वेळेस देहापुरते अन्न मागण्यास ,आत्मसाक्षात्कारासाठी साधना करणा-या संन्याशाला भिक्षा मागण्याचा अधिकार शास्त्र देते .समर्थ म्हणतात :

नित्य नूतन हिंडावे । उदंड देशाटन करावे । तरीच भिक्षा मागतां बरवे । श्लाघ्य वाणे । । १४-२-८
अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेस । जिकडे तिकडे स्वदेस । भुवनत्रैं । । १४-२-९
जेव्हा साधकाला आपल्याला भगवंत सांभाळतो ,असा दृढ़ विश्वास असतो ,तेव्हा त्याला कशाचीच चिंता उरत नाही .तो सतत हिंडतो ,देशाटन करतो ,त्याला तो कोठेही गेला तरी त्याला 'हे विश्वची माझे घर 'असे वाटते .आणि त्यातून त्याचे वैराग्य फुलत जाते .म्हणून समर्थ म्हणतात :
भिक्षे ऐसे नाही वैराग्य । वैराग्यापरते नाही भाग्य । वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी । । १४-२-१९
श्री समर्थानी भिक्षेतून अनेक गोष्टी साधल्या .समर्थ म्हणतात :
भिक्षा म्हणिजे कामधेनू । सदा फळ नव्हे सामान्यु । भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी । । १४-२- १२
भिक्षेने वोळखी होती । भिक्षेने भरम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी । । १४-२-१३
भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती । भिक्षेने प्रगटे महंती । स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षा गुणे । । १४-२-१४
भिक्षेस नाही आडथळा । भिक्षाहारी मोकळा । भिक्षेकरता सार्थक वेळा । काळ जातो । । १४-२-१५
भिक्षा म्हणजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगडली । अवकाळी फळ दायेनी जाली । निर्ल्लजासी । । १४-२-१६
समर्थांच्या मते भिक्षा म्हणजे कामधेनू च ! हवे ते फळ देणारी ! भिक्षेने नव्या ओळखी होतात ,चुकीच्या कल्पना नाहिशा होतात .भिक्षा मागणारा निर्भय असतो .अध्यात्मिक पुढारी पण प्रगट होते .त्याच्यावर कोणतेही बंधन नसते .म्हणून भिक्षेला समर्थ अमरवल्ली म्हणतात .कारण ती फळ दायिनी आहे .

Monday, October 11, 2010

प्राण्यांमध्ये ,माणसांमध्ये भेद का आढळतो?

जशा सर्व प्रकाराच्या माळांमध्ये मणी दो-यात ओवलेले असल्यामुळे मणी एकत्र राहतात ,त्याप्रमाणे आत्मा सर्व प्राण्यांमध्ये सर्व वस्तूंमध्ये असतो .परन्तु दोरा व प्राणी यात सारखेपणा नाही .जसे दोरा मण्याला व्यापत नाही ,परन्तु आत्मा सर्व देहाला व्यापतो .आत्म्याच्या ठिकाणी चेतना असते ,तशी देहाच्या ठिकाणी नसते .सर्व वस्तुत आत्मा असतो पण तो सगळीकड़े सारख्या प्रमाणात नसतो .त्यामुळे वस्तू व प्राणी यांच्यात कमी जास्त पणा ,उंच नीच पणा आढळतो .ही गोष्ट स्पष्ट करण्या साठी समर्थांनी काही उदाहरणे दिली आहेत :
वेलींमध्ये रस असतो ,पण प्रत्येकाची चव वेगळीअसते .उसाताही रस असतो .तो रस आणि रसहीन उसाची चिपाडे सारखी नसतात .तसे राजा पासून रंका पर्यंत अनेक प्रकाराचे लोक येथे राहतात पण ते सरसकट सारख्या दर्जाचे नसतात .समर्थ म्हणतात :
येकांशे जग चाले । परी सामर्थ्य वेगळाले । येकासंगे मुक्त केले । येकासंगे रवरव । । १३-१०-१०
साकर माती पृथ्वी होये । परी ते माती खाता न ये । गरळ आप नव्हे काये । परी ते खोटे । । १३-१०-११
पुण्यात्मा आणि पापात्मा । दोहींकड़े अंतरात्मा । साधू भोंदू सीमा । सांडूच नये । । १३-१०-१२
ईश्वराच्या एकाच अंशाने जग चालले आहे .तरी प्रत्येक वस्तूचे सामर्थ्य वेगवेगळे असते .जसे एकाच्या संगतीने मोक्ष मिळतो,तर एकाच्या संगतीने नरकात जावे लागते .माती व साखर प्रुथ्वीचीच रूपे असली तरी माती खाता येत नाही .सापाचे विष व पाणी पाण्याची रूपे असली तरी सापाचे विष पिऊन चालत नाही .तसे पुण्यवान माणूस व पापी माणूस यांच्यात अंतरात्मा एकच असला तरी ते दोघे सारखे नसतात .ज्याप्रमाणे विद्वान् व वात्रट मुले सारखी नसतात ,तसे गंगेचे पाणी ,मोरीतले पाणी ,कपडे धुतलेले पाणी जरी पाणीच असेल तरी सारखे नसते .तसे शुध्द विचार ,शुध्द आचार असलेला ,अनासक्त मनाचा माणूस इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो .पाण्यापासून अन्न होते व अन्नाची उलटी होते ,म्हणून वांतीचे भोजन करता येत नाही .म्हणूनच माणसा माणसां मध्ये भेद आढळतो .

सुख दू:खाचा भोक्ता कोण ?

तवं श्रोता करी प्रश्न । देही सुखदु :खाचा भोक्ता कोण । पुढे हेचि निरूपण । बोलिले असे । । १३-८-३८
श्रोता प्रश्न करतो की या देहात सुखदु :खा चा भोक्ता कोण आहे ?
देह व आत्मा ,एकाशिवाय दूसरा काही करू शकत नाही .ही गोष्ट पटविण्यासाठी अनेक उदाहरणे दिली आहेत .उदा:
आत्मयास शरीरयोगे । उद्वेग चिंता करणे लागे । शरीरयोगे आत्मा जगे । हे तो प्रगटची असे । । १३-९-१
देह अन्नचि खायेना । तरी आत्मा कदापि जगेना । आत्म्याविण चेतना । देहास कैंची । । १३-९-२
शरीराशी संबंध आल्याने जीवात्मा दु :ख ,चिंता करतो .शरीराच्या सहाय्याने आत्मा जगतो .देहाने अन्न खाल्ले नाही तर आत्मा जगत नाही .जीवात्मा नसेल तर देह मरतो .जीव व देह यांच्या सहाय्याने ,संयोगाने मानवी जीवनात कार्य घडतात .समर्थ म्हणतात :
उत्तम द्रव्य देह खातो । देह योगे आत्मा भुलतो । विस्मरणे शुध्दी सांडितो । सकळ काही । । १३-९-७
देह मादक पदार्थ सेवन करतो ,जीवात्मा भ्रमतो ,त्याचे भान नाहीसे होते .सगळी शुध्दी लोपते .देहाने विष घेतले तर जीवात्मा देह सोडतो .अनेक उदाहरणे देउन समर्थांनी पटवून दिले आहे की देहामुळे जीवात्म्याला सुख दु :ख भोगावे लागते .जे जे उपचार देहाला केले जातात ते जीवात्म्याला पावतात .देहाला मिळालेले सुग्रास भोजन ,थंडीच्या दिवसात मिळालेले उबदार कपडे ,थंडी वारा उन पाऊस या पासून मिळालेला निवारा ,हे सर्व देहासाठी होत असेल तरी समाधान मात्र जीवात्मा भोगतो .समर्थांनी उदाहरणात म्हटले आहे :
तृषेने शोकले शरीर । आत्म्यास कळे हा विचार । मग उठवून शरीर । चालवी उदाकाकडे । । १३-९-१४
उदक मागे शब्द बोलवी । मार्ग पाहोन शरीर चालवी । शरीर अवघेची हालवी । प्रसंगानुसार । । १३-९-१५
तहान लागली ,शोष पडला की जीवात्म्याला समजते ,मग शरीराला उठवून जीवात्मा पाण्याकडे नेतो ,मला पाणी पाहिजे ,असे शब्द शरीराकडून बोलावतो ,रस्ता बघून शरीराला चालवतो ,प्रसंगाप्रमाणे हालचाल करवतो.अशा प्रकारे देहात आत्मा राहतो ,देहाच्या द्वारे अनेक सुख दु :ख भोगतो .देहात राहणारा ,सुख दु :खे भोगणारा,जीवात्माच असतो .शरीरातून जीवात्मा निघून जातो तेव्हा देह प्रेत बनतो .