Monday, November 29, 2010

अखंड ध्यान म्हणजे काय ?

आपण आपल्या डोळ्याने दुस-याचा डोळा पाहतो .मनाने दुस-याचा मनाचा शोध घेतो .तसेच आपल्या अंतरात्म्याच्या सहाय्याने दुस-याच्यात असलेला अंतरात्मा पाहता येतो .अंतरात्माच सर्व काही घडवून आणत असतो .त्याच्या शिवाय देह काहीच करू शकत नाही .आपण जी हालचाल करतो ,ती हालचालही अंतरात्माच आपल्याकडून करवून घेत असतो .त्यामुळे अंतरात्मा जाणून घेण्यासाठी त्याचे अखंड ध्यान करायला हवे .समर्थ म्हणतात :
अखंड ध्यानाचे लक्षण । अखंड देवाचे स्मरण । याचे कळता विवरण । सहजचि घड़े । । १४-८-२४
सहज सांडून सायास । हाचि कोणी येक दोष । आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानी धरती । । १४-८-२५
परि ते धरीताही धरेना । ध्यानी येती वेक्ती नाना । उगेची कष्टती मना । कासाविस करुनी । । १४-८-२६
अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण ! ध्यान आणि स्मरण यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे .देवाचे सतत स्मरण केले की देवाशी सतत अनुसंधान रहाते .मग ते स्मरणच ध्यान होते .बरेच वेळा मुद्दाम जेव्हा ध्यानाचा प्रयत्न केला जातो तेव्हा ध्यान करणारा मी व ज्याचे ध्यान करायचे तो असे वेगळे होते मग ते ध्यान अनात्म्याचे होते .प्रयत्न करूनही ध्यान टिकत नाही ,कारण ध्यानात अनेक नको त्या गोष्टी येतात ,अनेक व्यक्ती येतात ,मग मन कासाविस होते .एखाद्या मूर्तीचे ध्यान करू लागले तर ती मूर्ती न दिसता वेगळेच दिसते .जे भासायला नको ते भासते .त्यासाठी आपली श्रध्दा नक्की कोठे आहे ते ओळखायला शिकायला हवे .तरच ध्यान साधते ।
ध्यान साधण्यासाठी साधकाचे मन एकाग्र असायला हवे ,एके ठिकाणी गोळा व्हायला हवे .मनात विचारांचा गोँधळ असेल ,अनेक विचार मनात असतील तर ध्यान नीट लागत नाही .समर्थ म्हणतात :
ध्यान धरिते ते कोण । ध्यानी आठवते ते कोण । दोनी मध्ये अनन्य लक्षण । असिले पाहिजे । । १४-८-३८
अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे समाधाने १४-८-३९
ध्यान करताना जो ध्यान करतो तो ,ज्याचे ध्यान करायचे आहे तो ,असे दोघे असताना त्यांच्यात समरसता होणे ,त्यांची अखंडता न लोपणे ,दोन्ही अनन्य होणे हे अखंड ध्यानाचे लक्षण आहे .समर्थ म्हणतात ;
ध्यान करणारा व अंतरात्मा दोघेही मुळातच अनन्य आहेत .ही गोष्ट सामान्यांच्या लक्षात येत नाही .परन्तु ज्ञानी मात्र त्याचा शोध घेतो ,दोन्ही एकच असल्याची ,दोन्ही अनन्य असल्याची अनुभूती तो घेतो .म्हणून परंपरागत पध्दतीने ध्यान करणे हे ध्यानाचे लक्षण नसून अवलक्षण आहे .

आत्मसाक्षात्कारी कसा असतो ?

दशक १४ स .७ मध्ये समर्थ आत्मसाक्षात्कारी कसा असतो याचे वर्णन करतात ।
पुरश्चरणी कायाक्लेशी । दृढवतीपरम सायासी । जगदीशा वेगळे जयासी । थोर नाही । । १४-७-७
काया वाचा जीवे प्राणे । कष्टे भगवंता कारणे । मने घेतले धरणे । भजन मार्गी । । १४-७-८
ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरी विभक्त । संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणे । । १४-७-९
अंतरा पासून वैराग्य । तेंची जाणावे महदभाग्य । लोलंगते एव्हडे अभाग्य । आणिक नाही । । १४-७-१०
आत्मसाक्षात्कारी पुरश्चरणे [मंत्रामध्ये जेव्हडी अक्षरे असतील तेव्ह्ड़े लक्ष जप करणे ] करतो .शरीराला कष्ट देतो ,दृढपणे आपले व्रत सांभाळतो। .श्रम करतो .त्याला फक्त भगवंतच श्रेष्ठ वाटतो । शरीराने ,वाणीने , जीवाने ,प्राणाने तो भगवंतासाठी कष्ट करतो .त्याचे मन सतत भगवंताचे भजन करण्यात रममाण होते .असा भगवंताचा भक्त अंतरातून विरक्त असतो .भगवंतासाठी संसार सोडतो .त्याला अगदी अंतरा पासून वैराग्य आलेले असते .आसक्ती लोभ नसतो म्हणून समर्थ अशा आत्मसाक्षात्कारी माणसाला महाभाग्यवान म्हणतात ।
ऐसा जो का योगेश्वर । अंतरी प्रत्ययाचा विचार । उकलू जाणे अंतर । प्राणीमात्राचे । । १४-७-१२
ऐसी वृत्ती उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्शन मात्रे समाधान । पावती लोक । । १४-७-१३
बहुतांसकरी उपाये । तो जनाच्या वाटया न ये । अखंड जयाचे हृदये । भगवद्रूप । । १४-७-१४
जनास दिसे हा दुश्चित्त । परी तो आहे सावचित्त । अखंड जयाचे चित । परमेश्वरी । । १४-७-१५
अशा आत्मसाक्षात्कारी जो असतो त्याला समर्थ योगेश्वर म्हणतात .तो अन्तर्यामी वृत्तीने उदासीन असतो ,विवेकी असतो .विवेक त्याला स्वानुभवाने प्राप्त झालेला असतो .तो अनासक्त ,वैराग्यशील असतो .या सर्व गुणांमुळे त्याला आत्मसाक्षात्कार होतो .

Monday, November 22, 2010

गृहस्थाश्रम उत्तम का ?

गृहस्थाश्रम उत्तम का ?
नाना वेश नाना आश्रम । सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम । जेथे पावती विश्राम । त्रैलोक्य वासी । । १४-७-१
देवहृषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी । पितृआदि करून विभागी । अतीत अभ्यागत । । १४-७ -२
गृहस्थाश्रमी निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले । परन्तु गृहस्थागृही हिंडू लागले । कीर्तीरूपे । । १४-७-३
याकारणे गृहस्थाश्रम । सकळामध्ये उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया । । १४-७-४
ब्रह्मचर्याश्रम ,गृहस्थाश्रम ,वानप्रस्थाश्रम ,संन्यासाश्रम असे वेगवेगळे आश्रम आहेत .पण या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे कारण देव ऋषी मुनी योगी तपस्वी या सर्वांना गृहस्थाश्रमात च जन्म घ्यावा लागतो .ते सर्व जरी गृहस्थाश्रम सोडून जातात तरी कीर्ती मिळवल्यावर गृहस्थाश्रमातून त्यांची सर्व व्यवस्था होते ।
त्यामुळे या सर्व आश्रमात गृहस्थाश्रम उत्तम आहे .परंतु त्यात स्वधर्माचे आचरण व भूतदया असावी .अध्ययन ,अध्यापन ,दान ,प्रतिग्रह ही शट कर्मेही हवीत .धर्मशास्त्रा प्रमाणे सर्व क्रियांचे आचरण ही घडायला हवे .तेथेच भक्तीही आढळते .नियमीत व शास्त्रोक्त पद्धतीने आचरण ज्या गृहस्थाश्रमात होतो तो गृहस्थाश्रम धन्य असतो ,उत्तम असतो .