कल्पांती संहार घडेल असे समर्थांनी सांगितल्यावर श्रोत्यानी त्यांना पंचप्रळयाविषयी सांगण्यास सांगितले .समर्थ उत्तर देतात :
ऐक प्रळयाचे लक्षण । पिंडी दोनी प्रळये जाण। येक निद्रा येक मरण । देहांतकाळ । । १०-५-१ । ।
देह्धारक तिनी मूर्ती । निद्रा जेव्हा संपादिती । तो निद्राप्रळय श्रोती । ब्रह्मांडीचा जाणावा । । १०-५-२ । ।
तिनी मूर्तीस होइल अंत । ब्रह्मांडाचा मांडेल कल्पांत । तेव्हा जाणावा नेमस्त । ब्रह्मप्रळये जाला । । १०-५ -३ । ।
दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडी । चारी प्रळय नवखंड़ी। पांचवा प्रळय उदंडी। जाणीजे विवेकाचा । । १०-५-४ । ।
पिंडाचे दोन ,ब्रह्मांडाचे दोन आणि पाचवा विवेक असे पाच प्रळय समर्थ सांगतात .तेव्हा हे पाच प्रळय अनुभवाला कसे येतात असा प्रश्न श्रोते विचारतात ,तेव्हा समर्थ उत्तर देतात :
निद्रा जेव्हा संचरे। तेव्हा जागृती व्यापार सरे । सुषुप्ती अथवा स्वप्न भरे । अकस्मात अंगी । । १०-५-६ । ।
या नाव निद्राप्रळये । जागृतीचा होये क्षये । आता ऐका देहांतसमये । म्हणिजे मृत्युप्रळये । । १०-५-७ । ।
देही रोग बळावती । अथवा कठीण प्रसंग पडती। तेणे पंचप्राण जाती । व्यापार सांडूनी । । १०-५-८ । ।
माणूस झोपतो तेव्हा त्याचे सगळे व्यवहार थांबतात .त्याला गाढ झोप लागते किंवा त्याला स्वप्न पडतात .यालाच निद्रा प्रळय म्हणतात .देहाच्या अंतकाळी शरीरात रोग बळावतो ,देहाला मार बसतो ,अपघात होतो .देहात
राहणारे ,शरीराला जिवंत ठेवणारे पंचप्राण देह सोडून जातात .प्राणाबरोबर मनाची जाणीवही निघून जाते .मृत शरीर फक्त राहते .याला मृत्यु प्रळय म्हणतात .आता समर्थ ब्रह्मांडाचा प्रळय सांगतात :
तिसरा ब्रह्मा निजेला । तों हा मृत्यलोक गोळा जाला । अवघा व्यापार खुंटला । प्राणीमात्रांचा । । १०-५ -१० । ।
ब्रह्मांडाचा पहिला प्रळय म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र.ब्रह्मदेव झोपी गेला की मृत्युलोकाचा गोळा होतो .सर्व प्राण्यांचे व्यापार बंद पडतात .प्राण्यांचे सूक्ष्म देह ब्रह्मांडातील वायूमध्ये जाऊन मिसळतात.
यापुढे समर्थ दूसरा ब्रह्म प्रळय सांगतात :यावेळेस ब्रह्मदेवाचा शेवट होतो .त्याचे वर्णन समर्थ करतात :
शत वरुषे मेघ जाती । तेणे प्राणी मृत्य पावती । असंभाव्य तर्के क्षिती । मर्यादेवेगळी। । १०-५-१३ । ।
सूर्य तपे बाराकाळी । तेणे पृथ्वीची होय होळी । अग्नी पावता पाताळी । शेष विष वमी । । १०-५-१४ । ।
शंभर वर्षे ढगच येत नाहीत .दुष्काळ पडतो ,जीवप्राणी मरतात .पृथ्वीला असंख्य मोठाले तडे जातात .बारा प्रकाराच्या किरणांनी सूर्य प्रकाषतो ,उष्णता निर्माण करतो .पृथ्वी जळू लागते .तो जाळ पाताळापर्यंत गेला की शेष विष ओकू लागतो .
आकाशात सूर्याचा डाह असतो .पाताळातून शेष विष ओकतो .त्याचा दाह असतो .त्यामुळे पृथ्वी जळते,मेरू पर्वताचे कडे कोसळतात .मेरू पर्वत घसरल्याने त्यावर राहणारे देव वायुचक्रात प्रवेश करतात .पृथ्वी जळून ख़ाक झाल्यावर हत्तीच्या सोंडेसारख्या धारांनी मोठा पाऊस पडतो .सर्वत्र पाणीच पाणी होते .अग्नी ते पाणी शोषून
घेते .ब्रह्मांडातील अग्नी एके ठिकाणी गोळा होतो .
समुद्रातील वड़वाग्नी ,शंकराच्या डोळ्यातील नेत्रांग्नी ,पंचमहाभूते ,अहंकार ,महतत्व यांचे पृथ्वी भोवतालीचे आवरण म्हणजे सात कंचुकीचा अग्नी ,सूर्य ,वीज यातील अग्नी गोळा होतात .देव देह सोडून वायूरूपात
जातात .वायूचे राज्य सुरु होते .वायूने अग्नी विझतो .धूर ज्याप्रमाणे आकाशात नाहीसा होतो त्याप्रमाणे वायु परब्रह्मात नाहीसा होतो .वायु परब्रह्मात लीन झाला की सूक्ष्म पंचमहाभूते ,त्रिगुण ,परब्रह्मात लीन होतात .अति शुध्द जाणीव राहते ,जगतज्योती नाहीशी होते .केवल स्वरुप स्थिती उरते .
शेवटी समर्थ पांचवा प्रळय म्हणजे विवेक प्रळय सांगतात :
प्रकृती अस्तां विवेक कीजे । त्यास विवेक प्रळय बोलिजे । पांचही प्रळय वोजे । तुज निरोपिले । । १०-५-२८ । ।
प्रकृती खरी वाटते .विश्व खरे वाटते .दृश्याचा निरास करण्यासाठी समर्थ आत्मानात्म विवेक करायला
सांगतात .विवेकाने दृश्य खरे नाही म्हणून बाजूला सारावे .त्याला विवेक प्रळय म्हणतात
Monday, June 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment