Wednesday, September 21, 2011

दासबोधाचा सारांश

दासबोधाच्या तत्वज्ञानाचा सारांश काय ?

२०-१० हा अखेरचा समास दासबोध या ग्रंथाचा सारांश आहे .यात प्रथम एकटे एक असलेले

परब्रह्म कसे आहे याचे वर्णन आहे .

धरुं जाता धरता न ये | टाकू जाता टाकता न ये | जेथे तेथे आहेच आहे | परब्रह्म ते ||

२०-१०-१ ||

जिकडे तिकडे जेथे तेथे | विन्मुख होता सन्मुख होते | सन्मुख पण चुकेना ते | कांही केल्या ||

२०-१०-२ ||

परब्रह्म धरावे म्हटले तर धरता येत नाही .टाकावे म्हटले तर टाकता येत नाही .ते परब्रह्म

सर्वत्र आहेच आहे .कोणत्याही दिशेला आपण वळलो तरी ते समोर आहेच .जसे एखादा बसलेला माणूस उठून गेला ,तर तेथे आकाश असतेच .कोणत्याही दिशेला तोंड वळवले तर आकाश तोंडा

समोर असतेच .माध्यान्हीचा सूर्य जसा सर्वांच्या माथ्यावर असतो तसे सर्वांच्या डोक्यावर आकाश असते .पण सूर्याचा दृष्टांत परब्र्ह्मासाठीलागू पडत नाही .कारण सूर्य एकदेशी आहे तर ब्रह्म सर्वदेशी आहे .

परब्रह्म पोकळ घनदाट | ब्रह्म सेवटाचा सेवट | ज्यासी त्यासी ब्रह्म नीट | सर्वकाळ || २०-१०-१०||

परब्रह्म पोकळ म्हणजे रिकामे आहे .पान्ते दाट भरलेले आहे .ब्रह्म पोकळ आहे म्हणजे त्याच्या खेरीज अन्य वस्तूच नाही म्हणून्ते भरलेले आहे .सगळ्यांचा शेवट ब्रह्मातच होतो .

दृश्या सबाहे अंतरी | ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी | आरे त्या विमळाची सरी | कोणास द्यावी ||

२०-१०-११ ||

वैकुंठ कैलास स्वर्गलोकी | ईंद्रलोक चौदा लोकी | पन्नगादीक पातळ लोकी | तेथेची आहे ||

२०-१०-१२ ||

कासी पासून रामेश्वर | आवघे दाटले अपार | परता परता पारावार | त्यास नाही || २०-१०-१३ ||

या ब्रह्मांडाच्या उदरात गच्च पणे भरलेले ब्रह्म दृश्याच्या आत बाहेर व्यापून आहे .त्या निर्मळ ब्रह्माची सर् कोणाला येत नाही .वैकुंठ ,कैलास ,स्वर्गलोक ,इहलोक ,परलोक ,ईंद्रलोक ,चौदालोक ,महासर्पाचे पाताळ लोक या सर्वांना ब्रह्म व्यापून आहे .काशीपासून रामेश्वर पर्यंत सगळीकडे ब्रह्म अपार व्यापून आहे .ते एकटे ,एकमेव ,अद्वितीय आहे ,

परब्रह्म सर्वांना व्यापून आहे ,सगळ्यांना स्पर्श करणारे आहे .ते पावसाने भिजत नाही .चिखलाने माखले जात नाही .पुराबरोबर वाहून जात नाही .ते सर्व दिशांना एकाच वेळी असते .

परब्रह्माने जणू काही आकाशाचा डोह केला आहे .त्या डोहातील पाणी उचंबळत नाही ,त्याची कल्पना करता येत नाही ,अशा अफाट विस्ताराने हा डोह पसरला असल्या सारखे वाटते .

संत साधूमहानुभावा | देव दानव मानवा | ब्रह्म सकळांसी विसावा | विश्रांतीठाव || २०-१०-१९ ||

संत साधू महात्मे देव दानव मानव या सगळ्यांच्या विश्रांतीचे स्थान परब्रह्मच आहे .ते अनंत ,अमर्याद आहे .ते स्थूल नाही ,सूक्ष्म नाही ,या विश्वातील कोणत्याही गोष्टी सारखे नाही ,की ज्याची उपमा परब्रह्माला देता येईल .पिंड ब्रह्मांड दोन्ही भासरूप आहेत .त्यांचा निरास झाला की ब्रह्म निराभास होते .

या सर्व व्यापक अनंत ब्रह्माला ओळखण्याचा उपाय समर्थ सांगतात .

ब्रह्मासी शब्दचि लागेना | कल्पना कल्पू शकेना | कल्पनेतीत निरंजना | विवेके वोळखावे ||

२०-१०-२४ ||

शुध्द सार श्रवण | शुध्द प्रत्ययाचे ज्ञान | विज्ञानी पावता उन्मन | सहजचि होते ||२०-१०-२५ ||

शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही .मानवी मन ब्रह्माची कल्पना करू शकत नाही .अशा या कल्पनातीत निरंजन स्वरूपाला विवेकाने ओळखायला हवे असे समर्थ सांगतात .त्यासाठी श्रवण व मनन करायला हवे .मग ब्रह्म स्वरूप ओळखता येते .जन्म सार्थकी लागतो .संपूर्ण समाधान होते .

श्रवण व मनन करून स्वानुभव घेतला की ज्ञानाचे विज्ञान होते .उन्मनी अवस्था प्राप्त होते .उन्मनी अवस्था प्राप्त झाली की साधनेचे फळ मिळते .संसार सफल होतो .निश्चळ व निर्गुण परब्रह्म अंतर्यामी स्थिर होते .साधना विराम पावते

या दृश्य विश्वाचे स्वप्न पाहणारा जीव आत्मज्ञानाच्या जागेपणात आल्यावर दृश्यभास विसरतो .अनिर्वचनीय परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो .जन्म मृत्यू शून्यवत होतो .साधक अमृत पदाला पोहोचतो ..शेवटी समर्थ सांगतात की दासबोध म्हणजे भगवंताची वाणी आहे .तोच खरा ग्रंथकर्ता आहे .

हा प्रकल्प सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण !

देवाचे स्वरुप

देवाचे स्वरूप कसे असते ? देवदर्शन करून घेण्याचा उपाय कोणता ?


श्रोते समर्थांना विचारतात ,महाराज देवाचे स्वरूप कसे असते ? ते कृपा करून सांगा .

समर्थ सांगायला सुरुवात करतात .

विचार पाहता तगेना | त्यास देव ऐसे म्हणवेना | परंतु जन राहवेना | काये करावे || २०-९-८ ||

विचाराने परीक्षण केले तर जे शाश्वत पणे टिकत नाही तो देव नाही .म्हणून

मृत्तिका पूजन करावे | आणि सवेचि विसर्जावे | हे मानावे स्वभावे | अंत:करणासी || २०-९-१ ||

देव पूजावा आणि टाकावा | हे प्रशस्त न वटे जीवा | याचा विचार पहावा | अंतर्यामी || २०-९-२

||

देव करिजे ऐसा नाही | देव टाकिजे ऐसा नाही | म्हणोनि याचा अर्थ | विचार पाहावा || २०-९-३

||

देव नाना शरीरे धरितो | धरुनी मागुती सोडितो | तरी तो देव कैसा आहे तो | विवेके वोळखावा

||२०-९-४ ||

मातीचा देव आणून त्याची पूजा करायची ,त्याचे विसर्जन करायचे हे मनाला पटत नाही .ज्या

देवाची पूजा करायची त्याला टाकून द्यायचे हे मनाला पटत नाही .कारण देव बनवता

येण्यासारखा नाही .तो टाकून देता येईल असाही नाही .देह धारण करणारा ,आणि सोडणारा

नाही .मग देव कसा आहे ते विवेकाने ओळखायला हवे .

देवदर्शन कसे करावे ?

देवदर्शन कसे करावे हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात :

खोटे ते खोटेची खोटे | खं-यासी तगेनात वालटे | मन अधोमुख उफराटे | केले पाहिजे || २०-९-

१७ ||

अध्यात्मश्रवण करित जावे | म्हणिजे सकळ काही फावे | नाना प्रकारीचे गोवे | तुटोनी जाते ||

२०-९-१८ ||

सुत गुंतले ते उकलावे | तैसे मन उगवावे | मानत मानत घालावे | मुळाकडे || २०-९-१९ ||

सकळ काही कालवले | त्या सकळाचे सकळ जाले | शरीरी विभागले | सकळ काही || २०-९-२०

||

काय ते येथेचि पहावे | कैसे ते येथेचि शोधावे | सूक्ष्माची चौदा नावे | येथेचि समजावी || २०-

९-२१ ||

जे खोटे आहे ,मिथ्या आहे ,अशाश्वत आहे ,ते खोटेच आहे .जे खरे आहे ,शाश्वत ,अनादी आहे

अनंत आहे ,सत्य आहे ,ते खरेच रहाते .त्याच्यासमोर खोटे टिकत नाही .माणसाचे मन

खोट्यामध्ये दृश्यामध्ये गुंतलेले असते .ते मन दृश्यातून काढून सत्यात ,शाश्वतात गुंतवावे

लागते बहिर्मुख असलेल्या मनाला अंतर्मुख बनवावे लागते . बहिर्मुख म्हणजे दृश्याकडे

धावणा-या मनाला अंतर्मुख बनवायला हवे .म्हणजे आपल्या अंतरात्म्याकडे ,चैतन्याकडे

वळवायला हवे .अंतरात्म्याचा शोध घ्यायला हवा .त्यासाठी श्रवण ,मनन करायला हवे . सुताचा

गुंता जसा आपण उकलतो तसा मनाचा गुंता उकलायला हवा .मनाला हळू हळू मायेच्या

पसा-या बाहेर काढायला हवे .प्रपंच ,मुलेबाळे ,संपत्ती ,स्थावर ,यात गुंतून न पडता ,हळू हळू

त्यांच्यात राहून अलिप्तपणे वागायला शिकायला हवे .

आपला स्थूळ देह ,सूक्ष्म देह कोणत्या तत्वांचा बनला आहे ,ती तत्वे शाश्वत आहेत हे बघताना

त्यांचा निरास करता आला पाहिजे . ब्रह्मांड ज्या पंचमहाभूतांचे व त्रिगुणांचे मिश्रण आहे ,त्याच

मिश्रणाने आपला देहही बनला आहे .त्या मिश्रणात कोणती तत्वे आहेत ,ज्या तत्वांनी आपले

शरीर बनलेले आहे ते ओळखायला हवे .

पृथ्वी ,आप ,तेज ,वायू ,आकाश ह्या पंचभूतांनी व सत्व ,रज तम या त्रिगुणांनी अष्टधा प्रकृती

बनली आहे .ही अष्टधा प्रकृती आपल्या देहातही कशी सामावलेली आहे ,ते ओळखायला हवे .

आपल्या देहात पंचभूतांचे सबंधित असलेले विषय आढळतात .

पृथ्वी तत्व : हाडे ,मांस ,त्वचा ,नाडी ,रोम

आप तत्व : रेत ,रक्त ,लाळ ,मूत्र ,घाम

तेज तत्व : भूक ,तहान ,आळस ,झोप ,मैथून

वायू तत्व : चळण ,वळण ,प्रसारण ,निरोध ,आकुंचन ,

आकाश तत्व : काम ,क्रोध ,शोक ,मोह ,भय

या विषयांनी आपल्या देहात पंचमहाभूते आढळतात .आपल्या शरीरात सत्व ,रज ,तम या

त्रिगुणांचे वास्तव्य असते ,पण या त्रिगुणांपैकी एक गुण प्राबल्य दाखवतो .म्हणजे पंचमहाभूते

व त्रिगुण आपल्या शरीरात असतातच .पण ही सगळी तत्वे अशाश्वत व नाशिवंत असतात .

स्थूळ देहाची २५ तत्वे असतात .

भूतपंचक : आकाश ,वायू ,तेज , आप ,पृथ्वी

विषयपंचक : शब्द ,स्पर्श ,रूप ,रस ,गंध

अंत:करण पंचक : अंत:करण ,मन ,बुद्धी ,चित्त ,अहंकार

प्राणपंचक : व्यान ,उदान ,समान ,अपान ,प्राण

पंचकर्मेंद्रिय : वाणी ,हात ,पाय ,जननेंद्रिय ,गुद

पंचज्ञानेंद्रिय : कान ,नाक ,त्वचा ,डोळे ,जीभ

या सर्व तत्वांकडे विवेकाने पाहिले तर कळते की ही सारी तत्वे नाशिवंत आहेत .अशाश्वत

आहेत .

स्थूल देहाची २५ तत्वे ,सूक्ष्म देहाची २५ तत्वे ,पंचमहाभूतांचे २५ विषय ,या सर्वांचा विचार केला

तर ही सर्व तत्वे मिथ्या ,अशाश्वत आहेत .म्हणजेच ही तत्वे मिळून बनलेला माझा देह

अशाश्वत आहे .

आता मूळमायेचे चौदा संकेत आपल्या देहात कसे आहेत ते बघायला समर्थ सांगतात .

मूळमाया संकल्परूप आहे .मनही संकल्प विकल्पांचे बनलेले आहे .म्हणजे मूळमाया मनाच्या

रूपाने आपल्या देहात आहे .

चैतन्य जे ब्रह्मांड चालवते ,तेच आपला देहही चालवते .म्हणजे संकल्प ,चैतन्य ,व अंत:करण

तीनही आपल्या शरीरात आहेत .

ज्या अवस्थेत गुण समान असतात ,त्याला गुणसाम्य म्हणतात .अष्टधा प्रकृती निर्माण होण्या

पूर्वी त्रिगुण समान होते .ती गुणसाम्य अवस्था असते .अशी गुणसाम्य अवस्था सूक्ष्म असते व

ती फक्त सिद्ध पुरुषच जाणू शकतो .

द्विधा दिसते शरीर | वामांग दक्षिणांग विचार | तोचि अर्धनारीनटेश्वर | पिंडी वोळखावा ||

२०-९-२५ ||

तोचि प्रकृतीपुरुष जाणिजे | शिवशक्ती वोळखिजे | षडगुणैश्वर बोलिजे | तया कर्दमासी ||

२०-९-२६ ||

आपल्या शरीराला डावा व उजवा असे दोन भाग आहेत .पण ते एकरूप आहेत .तेच आपल्या

पिंडात अर्धनारीनटेश्वर आहेत .अर्धनारी नटेश्वर तोच पिंडातला प्रकृती पुरुष आहे .तोच

शिवशक्ती आहे .तोच षड्गुनैश्वर आहे .आपल्या पिंडात असणारे त्रिगुण गुप्त रुपाने वास करत

असतात .तेच महत्तत्व असते .

अर्धमात्रा ,शुध्द तत्व ,गुणक्षोभिणी ही एकाच मूळ तत्वांची नावे आहेत .

मन ,माया ,जीव या तीनही या शरीराचा स्वभाव आहे . अशा प्रकारे मूळमायेच्या १४ नावांचा

संकेत आपल्या शरीरातच पहायला मिळतो .

पिंड पडता अवघेचि जाते | परंतु परब्रह्म राहाते | शाश्वत समजोन मग ते | दृढ धरावे ||

२०-९-३० ||

पिंड पडला की सगळे जाते .पण परब्रह्म तेव्हडे रहाते .ते शाश्वत आहे ,असे समजून घट्ट धरून

ठेवावे .आणि देवदर्शन करून घ्यावे .असे श्री समर्थ सांगतात .

आवाहन आणि विसर्जन

आवाहन आणि विसर्जन म्हणजे काय ?

आवाहन आणि विसर्जन | हेची भजनाचे लक्षण | सकळ जाणती सज्जन | मी काय सांगो ||

२०-८-३० ||

पूजेसाठी देवाला बोलावणे हे आवाहन ,व पूजा झाल्यावर देवाला स्वस्थानी पोचवणे हे विसर्जन

साधकावस्थेत दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे अस्तित्व पहाणे हे

आवाहन .निरंजन परब्रह्म हे अंतरात्म्याचे स्वस्थान आहे .दृश्य विश्वात सर्व ठिकाणी

अंतरात्म्याचा महिमा पाहतां आल्यावर तेथून निर्विकार निरंजन केवळ दृश्यरहित परब्रह्मा पर्यंत

पोहोचणे हे अंतरात्म्याचे विसर्जन आहे .

दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्मा बघायचा म्हणजे काय असा प्रश्न पडतो .

घरापासून सुरुवात करू .स्वच्छ सुंदर घर ,नीटनेटक्या वस्तू ,मंगल सुंदर वातावरण ,तेथे

परमेश्वरी वास आहे असे जाणवणे ,घराबाहेर छानशी रांगोळी ,स्वच्छ परिसर ,प्रसन्न वातावरण

पाहून आनंदी होणे म्हणजे अंतरात्म्याला पाहणे आहे .

हिरवीगार वनश्री ,फळांनी लगडलेले वृक्ष ,सुंदर आकर्षक रंगाचे फुलांचे ताटवे पाहून आनंद

घेताना परमेश्वराला आठवणे म्हणजे अंतरात्म्याला पहाणे .दुथडी भरून वाहणारी नदी

,कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, धबधब्याच्या पाण्याचा खळखळाट ,बघून ईश्वरी शक्तीचा

प्रत्यय घेणे म्हणजे अंतरात्मा पाहणे .

भूकंप ,सुनामी ,पूर यांसारखे निसर्गाचे रौद्र रूप बघून ईश्वराची किमया कशी आहे याचा प्रत्यय

घेताना ईश्वराची आठवण होणे म्हणजे अंतरात्मा आठवणे .निसर्गातील असंख्य प्राणी ,वनस्पती

,त्यांचे गुण दोष पाहून ईश्वराने केलेल्या किमयेचा प्रत्यय घेणे म्हणजे अंतरात्म्याला बघणे

.निसर्गात आढळलेली कोणतीही भव्य दिव्य गोष्ट पाहून मन आश्चर्य चकित होऊन ईश्वराची

आठवण होणे म्हणजे अंतरात्मा पहाणे .

अशाच रीतीने सर्वत्र अंतरात्मा पहात असताना कोणतीही कामना ,कल्पाना वासना न उरता ,जे

जे काही घडते ,ते अंतरात्म्या मुळे असा दृढ निश्चय होऊन शेवटी सर्वत्र परब्रह्म परमात्मा

ब्भारून राहिला आहे अशी खात्री होते .हे दृश्य विश्व मिथ्या आहे हे ,हे खरे नाही अशीही खात्री

होते .मग दृश्य विश्व नाहीशी होते आणि परब्रह्माची भेटी होते .मग माझे मी पण उरत नाही .

मीपणा संपतो तेव्हा परब्रह्माची भेटी तर होतेच पण त्यालाच विसर्जन असे ही म्हणतात

शरीरा सारिखे यंत्र दुसरे नाही

||शरीरासारिखे यंत्र |दुसरे नाही ||

ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या प्रपंच वृक्ष खूप वाढला .प्रपंचवृक्षाला अनेक रसाळ फळे लागली .त्या

फळांची गोडी चाखण्यासाठी अनेक प्रकारची शरीरे निर्माण झाली .त्यातले सर्वात उत्तम शरीर

मानवाचे निर्माण झाले .करण या शरीरात इतर प्राण्यांपेक्षा जाणीवेचे प्रमाण सर्वात अधिक आहे

सर्व प्राण्यांना बघायला डोळे ,ऐकायला कान चाखायला जीभ ,स्पर्श कळण्यासाठी त्वचा ,हुंगण्या

साठी नाक असते .पण सर्व प्राण्यांमध्ये ,मानव देहाने या पंचेंद्रीयांनी मिळणा-या ज्ञानाचा

उपयोग इतर प्राण्यांपेक्षा जास्त करून घेता येतो .मानवाने अनेक औषधी वनस्पती शोधून

काढल्या .मानव जातीला उपयोगी पडतील अशा वनस्पती निर्माण केल्या .मानवाला हानिकारक

असलेल्या वनस्पतींवर नियंत्रण मिळवले .

मानवाने आपल्या हातांच्या कौशल्याने अनेक प्रकारची कलमे करून फळांचे ,फुलांचे प्रकार

निर्माण केले .ज्या फुलांकडे पाहून आनंद मिळेल ,ज्या फळांचे रस चाखून जिभेला आनंद

मिळेल अशी फुले ,फळे मानवाने या देहाच्या सहाय्याने निर्माण केली .वन्य प्राण्यांवर आपल्या

बुद्धीसामर्थ्याने नियंत्रण मिळवले .मानव देहामुळेच आपल्या बुद्धीसामर्थ्यावर मानवाला उपयोगी

पडतील अशा प्राणी व वनस्पतींच्या जाती निर्माण केल्या .

निसर्गातील ज्या ज्या सुंदर गोष्टी आहेत ,उत्तम आहेत ,त्यांचे दृष्टी सुख मानव त्याच्या

शरीरातील डोळ्यांनी घेतो ,अनेक प्रकारच्या रसनांचा स्वाद त्याच्या रसनेने घेता येतो .सुमधुर

,सुश्राव्य संगीत ऐकून मानवाला त्याचे कान तृप्त करून घेता येतात .त्वचेतील शीतोष्ण

संवेदनांनी मानवाला आपले संरक्षण करून घेता येते .

या सर्व गोष्टीत असे दिसते ,की माणसात जाणीवेचे प्रमाण इतर प्राण्यांच्या मानाने खूपच

जास्त असते म्हणून मानव आपल्या देहाच्या सहाय्याने १४ विद्या ,६४ कलांमध्ये प्राविण्य

प्राप्त करून घेऊ शकतो .मानव देहामधील मानव विचार करू शकतो ,म्हणून या दृश्य विश्वा

बद्दल ,ते विश्व ज्या नियमांनी चालते ,त्या नियमांबद्दल विचार करतो .या नियमांचा वापर

करून ,मानवाला उपयोगी पडतील अशा वस्तू तो निर्मांकरू शकतो .ध्वनी लहरींचे संकलन

करून त्या पून्हा वितरीत करण्याचे काम मानवच करू शकतो .अनेक मार्गांनी वीज निर्माण

करून ती घराघरांत पोचोवण्याचे कामही मानच करू शकतो .हे दृश्य विश्व कशामुळे निर्माण

झाले ,आपल्या दृष्टीला दिसणारे सूर्यमंडळ ,त्यातील ग्रह ,गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनी चालते

म्हणून सूर्यमालेतील ग्रह स्वत:भोवती फिरत फिरत सूर्या भोवती फिरतात ही गोष्ट मानवाला

समजून घेता आली .सूर्य मालेचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न मानव करतो आहे .हे विश्व का

निर्माण झाले ? हे विश्व असेच का निर्माण झाले ? असे अनेक प्रश्न मानवाला पडतात .त्यांची

उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न मानव करतो आहे .

जन्म मृत्यू पुनर्जन्म ,मृत्युनंतर प्राणी म्हणजे त्याच्यातील चैतन्य कोठे जाते अशा अनेक

प्रश्नांची उत्तरे मानव मिळवू लागला आहे .

कर्मेंद्रियांच्या द्वारा माणूस विषयभोग भोगतो .मानव त्रिगुणांचा बनलेला आहे . म्हणजे त्यांचा

स्वभाव सत्व ,रज ,तम या तीन गुणांपैकी एकां गुणाचे प्राबल्य असणारा असतो .पण अवगुण

टाकून चांगले गुण अंगी बाणण्याचे सामर्थ्य फक्त मानव देहातच आहे .असा हा मानव देह

म्हणजे एक उत्तम यंत्रच आहे .

आंतरात्म्या ची प्रचिती

अंतरात्म्याची प्रचीती येण्यासाठी साधकाने काय करावे ?

श्रीसमर्थांनी २०-७ या समासात आत्म्याचे गुण सांगितले .तेव्हा श्रोते समर्थांना विचारतात

.अंतरात्म्याची प्रचीती येण्यासाठी साधकाने काय करावे ?

पिंडाचा बरा शोध घ्यावा | तत्वांचा पिंड शोधावा | तत्वे शोधिता पिंड आघवा | कळो येतो ||२०-

७-११ ||

जड देह भूतांचा | चंचळ गुण आत्मयाचा | निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा | जेथे तेथे ||२०-७-

१२ ||

निश्चळ चंचळ आणि जड | पिंडी करावा निवाड | प्रत्यया वेगळे जाड | बोलणे नाही ||२०-७-१३ ||

पिंडामधून आत्मा जातो | तेव्हां निवाडा कळो येतो | देहे जड हा पडतो |देखतदेखता ||२०-७-१४ ||

जड जितुके पडिले | चंचल तितुके निघोन गेले | जड चंचलाचे रूप आले | प्रत्ययासी || २०-७-

१५ ||

निश्चळी आहे सकळांस ठाई | हे तो पाहाणे न लागे कांही | गुणविकार तेथे नाही |निश्चळास

|| २०-७-१६ ||

अंतरात्म्याची प्रचीती येण्यासाठी साधकाने आपल्या देहाचा शोध घेणे आवश्यक आहे .आपल्या

शरीरात स्थूळ व सूक्ष्म अशी अनेक तत्वे आहेत . स्थूळ देहाची २५ तत्वे ,सूक्ष्म देहाची २५

तत्वे ,चार देहातील ३२ तत्वे ,अशी एकूण ८२ तत्वे आहेत . या सर्व तत्वांचा विचार केला तर

असे लक्षात येते ,की स्थूळ देह जड आहे ,पंचभूतांचा आहे ,नाशिवंत आहे .सूक्ष्म देहातील

जाणीव किंवा अंतरात्म्याचा गुण आहे .निश्चळ परब्रह्म सर्व व्यापी आहे . आपला पिंड जड

देह ,चंचळ अंतरात्मा ,निश्चळ परब्रह्म मिळून बनतो .

अंतरात्मा जो चंचळ आहे तो कालांतराने पिंडातून निघून जातो .प्राण ,चेतना शरीर सोडून जातो

आणि देह जड होऊन पडतो .जड निचेष्ट पडते .चंचल देह सोडून जाते .निश्चळ सर्वत्र व्यापून

असते .त्याच्या स्वरूपात कोणताही बदल होत नाही .विकार होत नाही .ते केव्हाही कोठेही

जसेच्या तसे रहाते .

पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने पिंडात जसा विचार करता येतो ,तसा ब्रह्मांडा च्या बाबतीत ही

करता येतो .

नाशिवंत पंचभूतांच्या कर्दमाने ,व त्रिगुणांच्या सहाय्याने अष्टधा प्रकृती म्हणजे हे ब्रह्मांड तयार

झाले .पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या निर्मितीला कारणीभूत असणारी ,जाणीवमय असणारी ,

चैतन्यमय असणारी मूळमाया या ब्रह्मांडाला शिवात्म्याच्या रूपात चालवते .मूळमाया जी

परब्रह्माचा संकल्प आहे ,ते परब्रह्म सर्वव्यापी ,अनादी अनंत आहे .या विश्वाच्या निर्मिती

पूर्वी ते होते ,आता ही आहे ,विश्वप्रलया नंतरही राहणार आहे .

आत्मा माया विकार करी | आळ घालीती ब्रह्मावरी | प्रत्यये सकळ कांही विवरी | तोचि भला

|| २०-७-१९ ||

ब्रह्म व्यापक अखंड | वरकड व्यापकता अखंड |शोधून पाहातां जड | कांहीच नाही || २०-७-२० ||

गगनासी खंडता नये | गगनाचे नासेल काये | जरी जाला माहांप्रलये | सृष्टीसंहार || २०-७-२१ ||

ब्रह्म सर्वत्र व्यापकपणे भरून आहे .त्यामुळे त्याच्या ठिकाणी बदल होत नाही .मायेची व

अंतरात्म्याची व्यापकता खंडीत आहे . त्याच्या ठिकाणी बदल घडत असतात .

ज्याप्रमाणे आकाशात ढग येतात ,पण नंतर नाहीसे होऊन आकाश पहिल्या सारखे दिसते

त्याप्रमाणे या विश्वाला चालवणा-या अंतरात्म्यामुळे दृश्य विश्व असल्या प्रमाणे भासते .पण

नित्यानित्य विवेक केला तर असे लक्षात येते की अंतरात्म्यामुळे हे दृश्य विश्व भासते पण

विवेकाने ते नाहीसे ही होते .विवेकाने अशाश्वत तत्वे नाहीशी होतात आणि न चळणा-या

स्वस्वरूपा पर्यंत पोहोचता येते .

आंतरात्म्या चे गुण

अंतरात्म्याचे गुण कोणते ?

अंतरात्म्याची वोळखण | तेचि जेथे चपळपण | जाणीवेचे अधिष्ठान | सावध ऐका || २०-६-९ ||

जेथे चपळपण आहे ,तेथे अंतरात्मा असतो .जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप असते .म्हणून जेथे जेथे जाणीव असते ,तेथे तेथे अंतरात्मा असतो .पण जाणीव उत्पन्न होताना अनेक प्रकारची रूपे घेते .

सुख दु:ख जाणता जीव | तैसाची जाणावा सदा शिव | अंत:करणपंचक अपूर्व |अंश आत्मयाचा || २०-६-१० ||

सुख व दु:खाची जीवाला जाणीव असते .त्याचप्रमाणे ती सादाशिवाला म्हणजे जगदीश्वराला सुध्दा असते .विलक्षण असे अंत:करणपंचक म्हणजे अंत:करण ,मन ,बुद्धी ,चित्त अहंकार ,हे अंतरात्म्याचे अंश आहेत .तसेच आकाशाचे गुण असलेले काम ,क्रोध ,भयं ,शोक ,मोह आत्म्याचे अंश आहेत .सत्व ,रज ,तम हे त्रिगुण ही आत्म्याचे गुण आहेत .

श्रोते विचारतात ,महाराज ,या आत्म्याचे आणखीन कोणते गुण असतात ते कृपा करून सांगावे .’’

श्रीसमर्थ सांगतात :

नाना चाळणा नाना घृती | नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती | अलिप्तपण सहजस्थिती | गुण आत्मयाचे || २०-६-१२ ||

द्रष्टा साक्षी ज्ञानघन | सत्ता चैतन्य पुरातन | श्रवण मनन विवरण |गुण आत्मयाचे || २०-६-१३ ||

दृश्य द्रष्टा दर्शन |ध्येय ध्याता ध्यान | ज्ञेय ज्ञाता ज्ञान | गुण आत्मयाचे || २०-६-१४ ||

वेदशास्त्रपुराणअर्थ | गुप्त चालिला परमार्थ | सर्वज्ञपणे समर्थ | गुण आत्मयाचे || २०-६-१५ ||

बध्द मुमुक्ष साधक सिद्ध |विचार पाहाणे शुध्द | बोध प्रबोध |गुण आत्मयाचे || २०-६-१६ ||

जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या | प्रकृती पुरुष मूळमाया | पिंड ब्रह्मांड अष्टकाया | गुण आत्मयाचे || २०-६-१७ ||

परमात्मा आणि परमेश्वरी | जगदात्मा आणि जगदेश्वरी | महेश माहेश्वरी | गुण आत्मयाचे || २०-६-१८ ||

अनेक प्रकारचे विचार ,धैर्य ,नवविधा भक्ती ,चार मुक्ती ,अलिप्तपणा ,सहजस्थिती ,द्रष्टा ,साक्षी ,ज्ञानघन ,सत्ता ,चैतन्य ,पुरातन ,श्रवण ,मनन ,विवरण ,दृश्य ,द्रष्टा ,दर्शन ,ध्येय ध्याता ध्यान ,ज्ञेय ज्ञाता ,ज्ञान या त्रिपुटी ,वेद शास्त्र ,पुराणे ,यांचा अर्थ ,गुप्तपणे चाललेला परमार्थ ,सर्वज्ञ पणे आलेले सामर्थ्य ,बध्द मुमुक्षु साधक सिद्ध ,शुध्द विचार ,बोध ,प्रबोध ,जागृती स्वप्न सुषुप्ती ,तुर्या ,प्रकृती पुरुष ,मूळमाया ,पिंड ब्रह्मांड ,आठ देह ,परमात्मा ,परमेश्वरी ,जगदेश्वरी ,महेश ,माहेश्वरी ,हे सर्व आत्म्याचे ,जाणीवेचे व्यक्त होण्याचे प्रकार आहेत .

जेव्हडे सूक्ष्म नामरूप आहे तेव्हडे सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहेत .सूक्ष्माच्या प्रांतात अंतरात्मा

जाणीवेची अनंत रूपे घतो .आदिशक्ती ,शिवशक्ती ,मुख्य मूळमाया ,सर्व प्रकारच्या शक्ती

,नाना पदार्थांची उत्पत्ती ,स्थिती ,पूर्वपक्ष ,सिध्दांत ,गाणे बजावणे ,संगीत ,अनेक अद्भूत विद्या

,ज्ञान अज्ञान ,विपरीत ज्ञान ,असद्वृत्ती ,सद्वृत्ती ,ज्ञान,अलिप्तपण ,पिंड ब्रह्मांडातील तत्वांचा

शोध ,अनेक तत्वांचा शोध ,अनेक तत्वांचा निवाडा ,स्पष्ट विचार करणे ,ध्यान ,अनुसंधान

,अनेक स्थिती ,अनेक प्रकारचे ज्ञान ,अनन्य आत्मनिवेदन ,३३ कोटी देव ,८८ हजार ऋशी

,भूतपिशाच्च ,३|| कोटी भुतावळ ,५६ कोटी चामुंडा ,९ कोटी कात्यायनी ,चंद्र ,सूर्य ,तारामंडळे

नक्षत्रे ,ग्रहमंडळे ,शेष ,कूर्म ,मेघमंडळे ,देव ,दानव ,मानव ,अनेक प्रकारचे जीव ,सर्व प्रकारचे

भाव अभाव ,असणे ,नसणे हे सगळे अंतरात्म्याचे गुण आहेत .

आत्माराम उपासना | तेणे पावले निरंजना |नि:संदेहे अनुमाना | ठावचि नाही || २०-६-३० ||

अनेक प्रकारच्या गुणांनी अंतरात्मा दृश्यात भरलेला आहे .असे त्याला पहाणे ही अंतरात्म्याची

उपासना आहे .अशी उपासना जो करतो ,त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होते .तो नि:संदेह होतो

.मग कल्पना उरत नाही

एक चौदा च्यार पांच

एक चौदा च्यार पांच म्हणजे काय ?

येथून पाहातां तेथवरी | चत्वार जिनस अवधारी | येक चौदा पांच चारी | ऐसे आहे || २०-५-१ ||

समर्थ सांगतात की या विश्वरचनेमध्ये फक्त चारच पदार्थ आहेत .एक चौदा पांच च्यारी !

शिष्य विचारतात एक चौदा पांच च्यार म्हणजे काय ?

समर्थ सांगतात :

परब्रह्म सकळांहून वेगळे | परब्रह्म सकळांहून आगळे | नाना कल्पने निराळे |परब्रह्म ते ||२०-५-२ ||

परब्रह्माचा विचार | नाना कल्पनेहून पर् | निर्मळ निश्चळ निर्विकार | अखंड आहे || २०-५-३ ||

परब्रह्म कांहीच तुळेना | हा येक मुख्य जिनसाना | दुसरा जिनस नाना कल्पना | मूळमाया ||२०-५-४ ||

परब्रह्म सर्व पदार्थांहून वेगळे ,आगळे आहे ,म्हणजे श्रेष्ठ आहे .मानवी कल्पनेच्या हून निराळे आहे .आपल्या कल्पनेच्या पलीकडे असणारे परब्रह्म निर्मळ ,निश्चळ ,निर्विकार व अखंड आहे .परब्रह्म हाच या विश्वरचनेचा मुख्य जिन्नस आहे .त्याच्या बरोबर कशाचीही तुलना करता येत नाही .कल्पनेने भरलेली मूळमाया दुसरा जिन्नस आहे .

नाना सूक्ष्मरूप |सूक्ष्म आणि कर्दमरूप | मुळींच्या संकल्पाचा आरोप | मूळमाया || २०-५-५ ||

हरिसंकल्प मुळीचा |आत्माराम सकळांचा | संकेत नामाभिधानाचा | येणे प्रकारे || २०-५-६ ||
निश्चळी चंचळ घेतले | म्हणौनि चैतन्य बोलिले | गुणसमानत्वे जाले |गुणसाम्य ऐसे || २०-५ -७ ||

अर्धनारीनटेश्वर | तोचि षड्गुणेश्वर | प्रकृतीपुरुषाचा विचार | शिवशक्ती ||२०-५-८ ||

शुध्दसत्वगुणांची मांडणी | अर्धमात्रा गुणक्षोभिणी | पुढे तिही गुणांची करणी | प्रगट जाली || २०-५-९ ||

मन माया अंतरात्मा | चौदा जिनसांची सीमा | विद्यमान ज्ञानात्मा |इतुके ठाई || २०-५-१० ||

परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण झाले ,त्याला मूळमाया म्हणतात .मूळमायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत .मूळमाया अत्यंत सूक्ष्म असून ती मिश्रणमय आहे ,निर्भेळ नाही .या मुळच्या संकल्पाला हरिसंकल्प म्हणतात .तोच सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा आत्माराम किंवा अंतरात्मा .निश्चळ ब्रह्मात चैतन्य जागे झाले ,म्हणून त्याला चैतन्य म्हणतात .त्रिगुणांचे प्रमाण सम असते म्हणून गुणसाम्य म्हणतात .अर्धनारीनटेश्वर ,षडगुणेश्वर ,शिवशक्ती ,प्रकृती पुरुष ,शुध्दसत्वगुणाची कल्पना ,अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी ,गुणक्षोभिणीतून प्रगट झालेले सत्व ,रज ,तम गुण ,मन माया अंतरात्मा ,ही सर्व मूळमायेचीच नावे आहेत .पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस आहे .

येथे पाहातां जाणीव थोडी | आदिअंत हे रोकडी | खाणी निरोपिल्या तांतडी | तो चौथा जिन्नस ||२०-५-१२ ||

च्यारी खाणी अनंत प्राणी | जाणीवेची जाली दाटणी | च्यारी जिनस येथूनी | संपूर्ण जाले || २०-५-१३ ||

पंचभूतामध्ये जाणीवेचा अंश कमी प्रमाणात असतो पण त्याच्या आधी व नंतर म्हणजे

पंच महाभूते उत्पन्न होण्याआधी व उत्पन्न झाल्यावर जाणीवेचे अस्तित्व असते .चार खाणीत

अनंत प्राणी आहेत .त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवेची गर्दी झालेली असते .