Friday, April 1, 2011

संगती चा परिणाम कसा असतो ?

संगतीचा परिणाम

अंतरात्मा स्वच्छ व शुध्द असला तरी त्याला देहाच्या सगतीने अनेक सुख दुख भोगावी लागतात .तसेच माणसाचे असते .जशी संगत लाभेल तसा माणूस घडतो .आपला आपण शत्रू बनतो .नाहीतर मित्र ! जशी संगती लाभते तसा माणूस घडतो .त्या व्यक्तीला गती किंवा अधोगती प्राप्त होते .समर्थ उदाहरण देतात :मुळी उदक निवळ असते | नाना वल्ली मध्ये जाते | संगदोषे तैसे होते |आंब्ल तीक्ष्ण कडवट ||

१७-७-१ ||

आत्मा आत्मपणे असतो | देहसंगे विकारतो |साभिमाने भरी भरतो | भलतीकडे ||१७-७-२||

पाणी मुळचे स्वच्छ असले तरी ज्या प्रकारच्या वेलीं ,वनस्पतींमध्ये ते शिरते त्याच्या संगतीचा दोष त्या पाण्याला लागतो व ते तिखट ,आंबट ,कडू ,गोड होते .तसा आत्मा मुळात आत्मरूपाने शुध्द असला तरी देहाच्या संगतीने त्याचे शुध्दपण नाहीसे होउन त्याच्यात विकार उत्पन्न होतात .

पाण्याला उसाच्या सगतीने गोडवा येतो .विषारी वेलीने पाण्याचा प्राणघातक रस तयार होतो .तसे अंतरात्म्याला निरनिराळ्या देहांच्या सगतीने निरनिराळे गुण आढळतात .

त्यामध्ये कोणी भले |ते संतसंगे निघाले | देहाभिमान सांडून गेले | विवेकबळे || १७-७-५ ||

उदकाचा नाशचि होतो | आत्मा विवेके निघतो | देहाभिमान सांडून गेले | विवेक बळे ||१७-७-६ ||

देहात जे चांगले असतात ते संतसंगतीत काळ घालवतात .त्यामुळे निर्माण होणारा विवेक त्यांना तरून नेतो .देहाभिमान नाहीसा होतो .देहबुद्धी नष्ट होते .पण जेव्हा पाण्याचा नाश होतो ,अंतरात्मा बाहेर पडतो

आपला आपण करी कुडावा | तो आपला मित्र जाणावा | आपला नाश करी तो समजावा | वैरी ऐसा ||

१७-७-८ ||

जो स्वत:ला सांभाळतो ,तो स्वत:चा मित्र असतो .जो स्वत:च स्वत:चा नाश करतो तो स्वत:चा वैरी असतो .

जो आपला आपण घातकी | तो आत्महत्यारा पातकी | याकारणे विवेकी |धन्य साधू ||१७-७-१० ||

पुण्यवंता सत्संगती | पापीष्टां असत्संगती | गती आणि अवगती |संगतीयोगे ||१७-७-११ ||

उत्तम संगती धरावी | आपली आपण चिंता करावी | अंतरी बरीत विवरावी | बुद्धी जाण तयाची ||१७-७-१२ ||

इहलोक आणि परलोक | जाणता तो सुखदायेक |नेणत्याकरितां अविवेक |प्राप्त होतो || १७-७-१३ ||

जाणता देवाचा अंश |नेणता म्हणिजे तो राक्षस | यामध्ये जे विशेष |जाणोन घ्यावे ||१७-७-१४ ||

जो स्वत: आपला घात करून घेतो ,तो आत्महत्यारा पातकी समजावा .पुण्यवान पुरुष सत्संगती धरतो तर पापी वाईट सगतीत रहातो .त्यामुळे एकाला गती मिळते तर दुसरा अधोगतीला जातो .म्हणून माणसाने उत्तम संगती धरावी .जाणत्याचे विचार समजावून घेउन त्याचे मनन चिंतन करावे .त्यामुळे इहलोकी व परलोकी सुख लाभते .तर वाईट संगतीत गुंतलेला नेणता अविवेकाने वागतो .जाणता देवाचा अंश असतो तर नेणता राक्षस ! जाणता सर्वांना मान्य होतो तर नेणता अमान्य .समर्थ म्हणतात :

उत्तम संगतीचे फळ सुख | अध्दम संगतीचे फळ दु:ख | आनंद सांडूनिया शोक | कैसा घ्यावा ||१७-७-१७ ||

उद्योगी व शहाण्या माणसाच्या संगतीने आपण उद्योगी व शहाणे बनतो .आळशी व मूर्ख माणसाच्या संगतीने आपण आळशी व मूर्ख बनतो .म्हणून नेहमी सत्संगती धरावी .

No comments: