मागा श्रोती पुसिले होते । दृश्य मिथ्या तरी का दिसते । याचे उत्तर बोलिजेल ते । सावध ऐका। ।
६ -८ -१ । ।
दृश्य मिथ्या असून का दिसते ?या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ म्हणतात :की संताचा अनुभव खरा मानावा .संत इंद्रियांना जे दिसते ते खरे मानत नाहीत .जड,मूढ़ ,अज्ञानी जीव त्याला खरे मानतात .केवळ इन्द्रियांना दिसते ते खरे नाही हे पटविण्यासाठी समर्थ अनेक दृष्टांत देतात .
मृगे देखिले मृगजळ । तेथे धावते बरळ। जळ नव्हे मिथ्या सकळ। त्या पशूस कोणे म्हणावे । ।
६ -८ -५ । ।
रात्रौ स्वप्न देखिले । बहूत द्रव्य सांपडले । बहुत जनास वेव्हारिले । ते खरे कैसेनि मानावे । । ६ -८ -६ । । हरिण मृगजळ पाहते व पाणी आहे या समजुतीने तेथे धावते .तेथे पाणी नाही ,पाण्याचा भास् आहे हे त्याला कळत
नाही .रात्री माणसाला स्वप्न पडले .त्या स्वप्नात पुष्कळ द्रव्य सांपडले ,स्वप्नात त्याने पुष्कळ लोकांशी व्यवहार केला हे खरे प्रत्यक्ष कसे मानता येते ?मंदिराच्या दरवाज्यावर अनेक गोपुरे ,मजले असतात ,त्यावर सुंदर पुतळ्या कोरलेल्या असतात .त्यांच्या शरीरातील वाकडेपणा,नजतेताला तिरपेपणा मन मोहून टाकते.पण त्या कशाच्या आहेत याचा विचार केला तर चुना ,वाळू ताग हे पदार्थ आढळतात.
सृष्टी बहुरंगी असत्य । बहुरूपाचे हे कृत्य । तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या । । ६ -८ -१२ । ।
ज्या प्रमाणे एकच बहुरूपी अनेक सोंगे घेतो ,त्याने घेतलेली सोंगे मिथ्या असतात ,त्याप्रमाणे अनंत नामरूपांनी नटलेली सृष्टी मिथ्या आहे ,मुळचे एकच परमार्थ स्वरुप तेव्हडे खरे असते .दृश्य खरे असते तो अविद्येचा परिणाम असतो .आपल्या इंद्रियांनी जे दिसते ते कसे फसवे असते त्याचीही उदाहरणे समर्थ देतात .
वरी पाहता पालथे आकाश । उदकी पाहता उताणे आकाश । मध्ये चांदिण्या हि प्रकाश । परी ते अवघे मिथ्या । ।६ -८ -१४ । ।
जितके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्ये रूपे दिसती । क्षणांमध्ये फूटोन जाती । रूपे मिथ्या । ।
६ -८- १७ । ।
वर पाहिले तर आकाश पालथे दिसते ,तेच आकाश पाण्यात उताणे दिसते ,या दोन्हीत चांदण्या चमकतात .पण हे सगळे मिथ्या असते .पाण्यावर पुष्कळ बुडबुडे दिसतात ,प्रत्येक बुडबुड्यात प्रतिबिंब दिसतात .बुडबुडे लगेच फुटतात .ती रूपही फुटतात .म्हणजे ती रूपे मिथ्या असतात .नदीतीराहून होडी ओझे घेऊन निघाली तर तिचे प्रतिबिंब पालथे दिसते .एखादे शस्त्र वेगाने हालवले तर दोन शस्त्रे दिसतात .दोरा ताणून वाजवला तर दोनपणे दिसतो .आरसे महालात सभा भरविली तर आरशात अनेक सभा दिसतात .असे अनेक प्रकार खरे नसून ख-या सारखे दिसतात .असे अनेक प्रकार खरे नसून ख-या सारखे वाटतात .या सर्वांचे कारण आहे माया ! माया अविद्येचे रूप घेऊन जीवाला भ्रमात पाडते .जादूगार जादूचे खेळ करतो .त्याने निर्माण केलेल्या वस्तू ख -या वाटतात ,खेळ संपल्यावर त्या वस्तू खोटया होत्या हे कळते .
साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे । दोन्ही पदार्थी अविश्वासे । सांगता मन ।
६ -८ -३५ । ।
माया खरी मानावी तर ती प्रत्यक्ष नाश पावते .माया खोटी म्हणावी तर ती प्रत्यक्ष दिसते .म्हणून माया खरी आहे व माया खोटी आहे या दोंहीवर मन विश्वास ठेवत नाही .माणसाच्या मनात होणारी विचारांची गुंतागुंत होण्याचे कारण आहे अविद्या .अविद्येतूनच मी देह आहे ही देह्बुध्दी जन्म पावते .देहबुध्दीनेच दृश्य खरे वाटते .समर्थ म्हणतात :
दृष्यभास अविद्यात्मक । तुझाही देहो तदात्मक । म्हणोनी हां अविवेक । तेथे संचारला । । ६ -८ -३८ । ।
दृश्याचा पसारा अविद्येने भरलेला आहे .आपला देह अविद्येत जन्म पावतो त्यामुळे मिथ्या असलेले दृश्य सत्य आहे असा अविवेक आपल्या अंतर्यामी संचारतो .पाहणारा द्रष्टा अविद्यामय असतो ,अविद्येने निर्माण केलेले ,दृष्याला धारण करणारा सूक्ष्म देह अविद्यामय असतो .पाहिलेले दृश्यही अविद्यामय ! म्हणून अविद्यामय देह मीच आहे या भावनेने दृश्य पसारा बघितला की तो खरा वाटतो .
Wednesday, September 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment