अंतरात्म्याची प्रचीती येण्यासाठी साधकाने काय करावे ?
श्रीसमर्थांनी २०-७ या समासात आत्म्याचे गुण सांगितले .तेव्हा श्रोते समर्थांना विचारतात
.अंतरात्म्याची प्रचीती येण्यासाठी साधकाने काय करावे ?
पिंडाचा बरा शोध घ्यावा | तत्वांचा पिंड शोधावा | तत्वे शोधिता पिंड आघवा | कळो येतो ||२०-
७-११ ||
जड देह भूतांचा | चंचळ गुण आत्मयाचा | निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा | जेथे तेथे ||२०-७-
१२ ||
निश्चळ चंचळ आणि जड | पिंडी करावा निवाड | प्रत्यया वेगळे जाड | बोलणे नाही ||२०-७-१३ ||
पिंडामधून आत्मा जातो | तेव्हां निवाडा कळो येतो | देहे जड हा पडतो |देखतदेखता ||२०-७-१४ ||
जड जितुके पडिले | चंचल तितुके निघोन गेले | जड चंचलाचे रूप आले | प्रत्ययासी || २०-७-
१५ ||
निश्चळी आहे सकळांस ठाई | हे तो पाहाणे न लागे कांही | गुणविकार तेथे नाही |निश्चळास
|| २०-७-१६ ||
अंतरात्म्याची प्रचीती येण्यासाठी साधकाने आपल्या देहाचा शोध घेणे आवश्यक आहे .आपल्या
शरीरात स्थूळ व सूक्ष्म अशी अनेक तत्वे आहेत . स्थूळ देहाची २५ तत्वे ,सूक्ष्म देहाची २५
तत्वे ,चार देहातील ३२ तत्वे ,अशी एकूण ८२ तत्वे आहेत . या सर्व तत्वांचा विचार केला तर
असे लक्षात येते ,की स्थूळ देह जड आहे ,पंचभूतांचा आहे ,नाशिवंत आहे .सूक्ष्म देहातील
जाणीव किंवा अंतरात्म्याचा गुण आहे .निश्चळ परब्रह्म सर्व व्यापी आहे . आपला पिंड जड
देह ,चंचळ अंतरात्मा ,निश्चळ परब्रह्म मिळून बनतो .
अंतरात्मा जो चंचळ आहे तो कालांतराने पिंडातून निघून जातो .प्राण ,चेतना शरीर सोडून जातो
आणि देह जड होऊन पडतो .जड निचेष्ट पडते .चंचल देह सोडून जाते .निश्चळ सर्वत्र व्यापून
असते .त्याच्या स्वरूपात कोणताही बदल होत नाही .विकार होत नाही .ते केव्हाही कोठेही
जसेच्या तसे रहाते .
पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने पिंडात जसा विचार करता येतो ,तसा ब्रह्मांडा च्या बाबतीत ही
करता येतो .
नाशिवंत पंचभूतांच्या कर्दमाने ,व त्रिगुणांच्या सहाय्याने अष्टधा प्रकृती म्हणजे हे ब्रह्मांड तयार
झाले .पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या निर्मितीला कारणीभूत असणारी ,जाणीवमय असणारी ,
चैतन्यमय असणारी मूळमाया या ब्रह्मांडाला शिवात्म्याच्या रूपात चालवते .मूळमाया जी
परब्रह्माचा संकल्प आहे ,ते परब्रह्म सर्वव्यापी ,अनादी अनंत आहे .या विश्वाच्या निर्मिती
पूर्वी ते होते ,आता ही आहे ,विश्वप्रलया नंतरही राहणार आहे .
आत्मा माया विकार करी | आळ घालीती ब्रह्मावरी | प्रत्यये सकळ कांही विवरी | तोचि भला
|| २०-७-१९ ||
ब्रह्म व्यापक अखंड | वरकड व्यापकता अखंड |शोधून पाहातां जड | कांहीच नाही || २०-७-२० ||
गगनासी खंडता नये | गगनाचे नासेल काये | जरी जाला माहांप्रलये | सृष्टीसंहार || २०-७-२१ ||
ब्रह्म सर्वत्र व्यापकपणे भरून आहे .त्यामुळे त्याच्या ठिकाणी बदल होत नाही .मायेची व
अंतरात्म्याची व्यापकता खंडीत आहे . त्याच्या ठिकाणी बदल घडत असतात .
ज्याप्रमाणे आकाशात ढग येतात ,पण नंतर नाहीसे होऊन आकाश पहिल्या सारखे दिसते
त्याप्रमाणे या विश्वाला चालवणा-या अंतरात्म्यामुळे दृश्य विश्व असल्या प्रमाणे भासते .पण
नित्यानित्य विवेक केला तर असे लक्षात येते की अंतरात्म्यामुळे हे दृश्य विश्व भासते पण
विवेकाने ते नाहीसे ही होते .विवेकाने अशाश्वत तत्वे नाहीशी होतात आणि न चळणा-या
स्वस्वरूपा पर्यंत पोहोचता येते .
No comments:
Post a Comment