आत्मा जाणण्यास कठीण आहे .तो ओळखायचा असेल तर संत सज्जनांकडे जावे असे समर्थ म्हणतात .आत्म्याला जन्मही नाही व मरणही नाही .हे कळण्यासाठी संत आपल्याला नित्यानित्य विचार व सारासार विचार शिकवतात .नित्यानित्य विचाराने खरा मी कोण हे कळते ,तर सारासार विचाराने खरा कर्ता कोण हे कळते .समर्थ म्हणतात :
विचारिता सज्जनासी । ते म्हणती की अविनासी । जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंची नये । । १३-६-१३
निराकारी भासे आकार । आणी आकारे भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेके वोळखावा । । १३-६-१४
निराकारात आकाराचा भास् होतो .म्हणजे निर्गुण निराकाराच्या एका भागावर या दृश्य विश्वाचा ,म्हणजे आकाराचा भास होतो .या दृश्य विश्वात आकाशाच्या रूपाने निराकाराचा भास् होतो .दोन्ही एकमेकात मिसळलेले असतात .म्हणून निराकार आणि आकार एकमेकांपासून दूर केले व त्यांना जाणणे म्हणजे नित्यानित्य विचार !
पंचभूतापासून निर्माण झालेले सगळे मायिक आहे .जसे दिसते तसे नसते .ते एकही नाही .अनेक दिसते .त्याउलट आत्मा एकच आहे .तो सर्व विश्व व्यापून आहे .आकाश आपल्याला भासते .इंद्रिय गोचर होते .स्थल कालाच्या उपाधीने आवरलेले असते .असे असले तरी ते अतींद्रिय ,निरुपाधी ,निराभासी ,अविनाशी गगनासारखे आहे .ब्रह्मस्वरुप आहे .परन्तु जे मायिक आहे ,ते नाशिवंत आहे ,तसे ब्रह्माचे नसते .ब्रह्म स्वरुप सद्गुरु कृपा ,मनन ,निदिध्यासन ,करून आपल्या अनुभवाच्या कक्षेत आणता येते .परमात्म स्वरुप निराकार आहे हाच सारासार विचार आहे ।
परमात्मा तो निराकार । जाणिजे हा विचार सार । आणि आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे । । १३-६-२१
देहाचा अंत होतो तेव्हा वायु देह सोडून जातो .वायूने देह सोडला तर ते शरीर मढे होते .ते शरीर काहीही करू शकत नाही .म्हणजे ते शरीर म्हणजे मी नाही हे कळते .जेव्हा आपण मी कर्ता असे म्हणतो ,तेव्हा आपण म्हणू ते व्हायला हवे .पण तसे होते असे नाही .म्हणजे मी कर्ता असे म्हणता येत नाही .
Thursday, September 30, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment