प्रपंच व परमार्थात ज्ञानाची लक्षणे सारखीच असतात .त्यांची प्रचिती महत्वाची असते .प्रपंचात जे ज्ञान असते ते इंद्रिय गोचर असते .त्यामुळे ते पारखून घेता येते .त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेता येते .उदा:बीज उगवेलेसे पहावे । तरी मग द्रव्य घालून घ्यावे .बी उगवते असे पाहून मग द्रव्य खर्च करून ते घ्यावे .देहाला झालेला रोग अमुक एक मात्रेने बरा होतो असा अनुभव आला ती मात्रा घेता येते .एखादा किमयागार लोखंडाचे सोने करून देतो म्हणाला तरी त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव नसताना त्याला काही देऊ नये नाही तर तो हातोहात फसवतो.नीट चौकशी केल्याशिवाय जर काम अंगावर घेतले ,तर काम तडिला जात नाही .तर उलट आपल्या जिवीताला धोका पोचण्याची शक्यता असते .रोग्याला औषध देण्याची सवय नसलेला वैद्य आणला तर तो रोगी दगावतोच.समर्थ म्हणतात :
दिवाळखोराचा मांड। पाहाता वैभव दिसे उदंड । परी ते अवघे थोतांड । भंड पुढे । । १०-८-१५ । ।
एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो की त्यापाशी खूप दौलत आहे पण त्याचा बडेजाव थोतांड असते .पुढे त्याची फजिती होते .ही सर्व उदाहरणे समर्थांनी प्रपंचातली दिली .आता परमार्थातल्या प्रचिती विषयी सांगतात :
तैसे प्रचितीवीण ज्ञान । तेथे नाही समाधान । करून बहुतांचा अनुमान । अन्हीत जाले । । १०-८-१६ । ।
ज्या पुरुषाला स्वानुभव नसतो ,त्याचे ज्ञान थोतांडच असते .त्याचे ज्ञान शाब्दिक असते प्रत्यक्ष प्रचिती त्याला आलेली नसते .त्यामुळे तो स्वत :चे व दुस-याचे हीत करू शकत नाही .परमार्थात आत्मप्रचिती आलेली कशी
ओळखावी ते समर्थ सांगतात :
पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली । ऐसी स्वये प्रचित आली । म्हणिजे बरे । । १०-८-२१ । ।
परमेश्वरास वोळखिले । आपण कोणसें कळले । आत्मनिवेदन जाले । म्हणिजे बरे । । १०-८-२२ । ।
ब्रह्मांड कोणे केले । कासयाचे उभारले । मुख्य कर्त्यास वोळखिले । म्हणिजे बरे । । १०-८-२३ । ।
पाप नाश पावले ,जन्मास येऊन यातना भोगणे थांबले असा प्रत्यक्ष अनुभव आला की आत्मज्ञान
झाले .परमेश्वराची ओळख झाली ,खरा मी कोण कळले ,संपूर्ण शरणागती साधता आली की आत्मज्ञान झाले .विश्व कोणी निर्माण केले ,ते कशाचे आहे ,त्या विश्वाचा खरा कर्ता कोण हे कळले की आत्मज्ञान झाले .हीच परमार्थातील प्रचिती !
Thursday, June 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment