सिध्दाची लक्षणे सांगावी अशी श्रोत्यांनी विनंती केली त्याचे उत्तर समर्थ देतात :
ऐक सिध्दांचे लक्षण । सिध्द म्हणिजे स्वरुप जाण। तेथे पाहातां वेगळेपण । मुळीच नाही । । ८ -९ -३ । ।
स्वरुप होऊन राहिजे । तया नाव सिध्द बोलिजे । सिध्द स्वरूपीच साजे । सिध्द्पण। । ८ -९ -४ । ।
रात्रंदिवस जेव्हा साधक आत्मस्वरूपाचे ध्यान व चिंतन जेव्हा करतो तेव्हा साधकाचे मन त्या स्वरूपाने आतबाहेर भरून जाते .अत्यंत सूक्ष्म बनते.मनात आमूलाग्र बदल होतो .मन उन्मन होते .मी ,तू ,देव भक्त हा द्वैतभाव
उरत नाही .त्यामुळे विश्वातले द्वैत ,भेद ,दृश्य वस्तू दिसत असूनही त्यात आत्मस्वरूप दिसते .त्याच्या अनुभवास फक्त आत्मस्वरूपाचे ज्ञान होते .सर्व भूतमात्रात आपणच आत्मरूपाने भरून असा प्रत्यय येतो .
सदा स्वरूपानुसंधान । हे मुख्य साधूचे लक्षण । जनी असोन आपण । जनावेगळा। । ८ -९ -९ । ।
स्वरूपानुसंधानात सिध्द असतो .तुकाराम महाराज जसे सतत ईश्वरचिंतनात मग्न असत ,जनात असूनही जनावेगळे असत .ते रोजची कामे करत पण मन मात्र स्वरूपानुसंधानात च !
स्वरूपी दृष्टी पडता । तुटोनि गेली संसार चिंता । पुढे लागली ममता । निरूपणाची। । ८ -९ -१० । ।
आत्मस्वरूपाची सतत अनुसंधान असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना संसाराची चिंता कधीच नव्हती .म्हणून मिळालेली ऊसाची मोळी त्यांनी मुलांना वाटून टाकली .व एक ऊस घेऊन घरी आले .
बाह्य साधकाचे परी । आणि स्वरूपाकार अंतरी । सिध्द लक्षण चतुरी । जाणिजे ऐसे । । ८ -९ -१२ । ।
सिध्द बाहेरून दिसायला साधका सारखा दिसतो ,पण आतून आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला असतो .
संदेहरहित साधन । तेचि सिध्दांचे लक्षण । अंतरबाह्य समाधान । चळेना ऐसे । । ८ -९ - १३ । ।
सिध्द जी साधना करतो ती संदेह रहित असते .म्हणजे आपण करतो ती साधना योग्य आहे की नाही ,ती साधना योग्य फळ देइल की नाही ,कोणत्या मार्गाने साधना करावी अशी कोणतीच शंका सिध्दाच्या मनात येत नाही .तेच सिध्दाचे लक्षण आहे . त्याच मुळे साधनेने तो निर्दोष ,निर्मम ,नि :स्वार्थ ,निष्काम ,निर्मल ,सम ,अत्यंत पवित्र अंत:करणाचा होतो .त्यामुळे कधीही भंग न पावणारे आतील व बाहेरील समाधान त्याच्याजवळ असते .
अचळ जाली अंतरस्थिती । तेथे चळणास कैसी गती। स्वरूपी लागता वृती । स्वरूपचि जाली । । ८ -९ -१४ । ।
सिध्दाची अंतरस्थिती अचळ होते .सुख दु:खे समे कृत्वा । अशी त्याची अवस्था असते .सुख दु:ख काहीही भोगावे लागले तरी मन विचलित होत नाही .सुखाने हुरळून जात नाही ,की दु :खाने कोलमडून पडत नाही .त्याच्या मनाची अवस्था अशी सम असते .त्यामुळे आत्मस्वरूपावरील त्याची एकाग्रता ढळत नाही .वृती स्वरूपाकार होते।
स्वरूपी स्वरुपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला। तरी चळेना । । ८ -९-१६ । ।
तो स्वस्वरूपात विलीन झालेला असल्याने स्वरूपाकारच असतो ,स्थिरच असतो .त्यामुळे तो एके ठिकाणी पडून राहिला किंवा उठून चालू लागला तरी अन्तर्यामी स्थिर असतो .
येथे कारण अंतरस्थिती। अंतरीच पाहिजे निवृत्ती । अंतर लागले भगवंती। तोचि साधू । । ८ -९ -१७ । ।
सिध्दावस्था प्राप्त होण्याचे मुख्य कारण असते त्याची अंतरस्थिती !तो अंतरातून सुटलेला असतो ,निवृत्त झालेला असतो .म्हणजे त्याच्या मनात कोणत्याही आशा ,आकांक्षा ,लोभ ,मोह ,आसक्ती ,नसते .सुख दु :खाच्या घटनांशी त्याला देणघेण नसते .त्यामुळेच त्याचे मन भगवंताशी एकरूप झालेले असते ,भगवंतच त्याच्या ह्रुदयात राहिलेला असतो .तोच साधू असतो .
Thursday, April 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment