श्रोते म्हणती हे प्रमाण । जाले परम समाधान । परी पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण। मज निरोपावे । । ९ -४ -४३ । ।
ब्रह्मांडी तेची पिंडी असे । बहुत बोलती ऐसे । परन्तु याचा प्रत्यय विलसे। ऐसे केले पाहिजे । । ९ -४ -४४ । ।
श्रोत्यांनी विनंती केली की पिंड व ब्रह्मांड सारखे कसे ते सांगावे .पिंडी ते ब्रह्मांडी असे सर्व लोक म्हणतात ,पण नेमके कसे ते कळत नाही तेव्हा कृपा करून उलगड़वून सांगावे .समर्थ म्हणतात :
पिंडासारखी ब्रह्मांड रचना । न ये आमुच्या अनुमाना । प्रचित पाहाता नाना । मते भांबावती । । ९ -५ -१ । ।
ब्रहमांडाची पिंडासारखी रचना आहे असे बोलण्याची पध्दत आहे .पण मनाला ते पटत नाही .तसा अनुभव ही येत नाही .
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । हे च्यारी पिंडीचे देह जाण।
विराट हिरण्य अव्याकृत मूळप्रकृती हे खूण । ब्रह्मांडीची । । ९ -५ -४ । ।
पिंडाचे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चार देह तर ब्रह्मांडीचे विराट , हिरण्य ,अव्याकृत मूळप्रकृती हे चार देह आहेत ,पण शास्त्रातले हे वर्णन काल्पनिक वाटते .कारण पिंडात अंतकरण तर ब्रह्मांडात विष्णू ,पिंडात मन तसे ब्रह्मांडात चंद्र,पिंडात बुध्दी तशी ब्रह्मांडात ब्रह्मदेव ,पिंडात चित्त तसे ब्रह्मांडात नारायण असतो .पिंडात अहंकार तसा ब्रह्मांडात रूद्र असतो .पण श्रोते विचारतात की विष्णूचे अंत :करण कोणते ?चंद्राचे मन असते .रूद्राचा अहंकार कसा असतो ?
या प्रश्नांचे उत्तर देताना समर्थ म्हणतात :
म्हणोंन हा अवघाच अनुमान । अवघे कल्पनेचे रान । भली न घ्यावे आडरान। तष्करी घ्यावे । । ९ -५ -२० । ।
कल्पून निर्मिले मंत्र । देव ते कल्पना मात्र । देव नाही स्वाधेन। मंत्राधेन। । ९ -५ -२१ । ।
जे पिंडी ते ब्रह्मांडी हा अनुमानाचा खेळ आहे .कल्पनेचे जंगल आहे .आपण ज्या देवतांना मानतो त्या सुध्दा काल्पनिक आहेत .कोणाच्यातरी मनात कल्पना येते ,तो मंत्र रचतो ,त्या मंत्राची देवता कल्पनेतून
निर्माण होते .मंत्राने देवतेची प्राणप्रतिष्ठा करतात .म्हणजे देवता स्वतंत्र नसतात .मंत्रांच्या अधीन असतात .पण त्यातही अनेक प्रश्न निर्माण होतात .ब्रह्मदेवाने जग निर्माण केले तर ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले ?विष्णू विश्वाचे पालन करतो तर विष्णूला कोण सांभाळतो?रूद्र किंवा शंकर विश्वाचा संहार करतो तर शंकराचा संहार
कोण करतो ?असा प्रश्न येतो .या सगळयांचा काळ नियंता आहे असे म्हटले तर काळाचा नियंता कोण असा प्रश्न येतो .या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत .म्हणजेच अज्ञानाचा अंध:कारच असतो .त्यासाठी आत्मानात्म विचार करावा लागतो .
ब्रह्मांड स्वभावेचि जाले। परंतु हे पिंडाकार कल्पिले । कल्पिले परी प्रत्यया आले । नाही कदा। । ९ -५ -२७ । ।
ब्रह्मांड आपोआप घडलेले आहे .त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली पण ती खरी असल्याचा अनुभव कोणालाच येत नाही .खरेच ब्रह्मांड पिंडासारखे आहे का असा शोध घेऊ लागले तर अनेक संशय निर्माण
होतात .श्रोते विचारतात :
औटकोटी भुतावळी। औट कोटी तीर्थावळी। औटकोटी मंत्रावळी । पिंडी कोठे । । ९ -५ -३० । ।
तेतीस कोटी सुरवर । अडोतीस सहस्र ऋषीश्वर । नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडी कोठे । । ९ -५ -३१। ।
च्यामुंडा छपन्न कोटी । कित्येक जीव कोट्यानुकोटी । चौ-यांशी लक्ष योनींची दाटी। पिंडी कोठे । । ९ -५ -३२ । ।
ब्रह्मांडी पदार्थ निर्माण जाले । पृथाकाकारे वेगळाले। तेहि तितुके निरोपिले । पाहिजेत पिंडी । । ९ -५ -३३ । ।
ब्रह्मांडात साडेतीन कोटी भुते,साडेतीन कोटी तीर्थ ,साडेतीन कोटी मंत्र आहेत .तेहेतीस कोटी देव ,८६ हजार
ऋषीश्वर ,नऊ कोटी कात्यायनी देवता आहेत .छपन्न कोटी चामुंडी आहेत ,कोट्यावधी जीव आहेत .चौ-यांशी लाख योनी आहेत .ते पिंडात कोठे आहेत ,पिंडात दाखवता येणे शक्य नाही .मग पिंडब्रह्मांड यांची रचना सारखी कशी होइल ?कारण ते तर्काने खरे ठरणारे नाही .यावर समर्थ सांगतात :
पांचभूते ते ब्रह्मांडी । आणि पांचचि वर्तती पिंडी । याची पाहावी रोकड़ी । प्रचित आता । । ९ -५ -३७ । ।
हे सर्व विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे व पिंडही पांच महाभूतांचा बनलेला आहे याचा प्रत्यक्ष अनुभव
घेता येतो .ब्रह्मांडात असलेली पृथ्वी ,आप ,तेज ,वायू ,आकाश ही सर्व भूते पिंडातही आहेत म्हणूनच म्हणतात :
पिंडी ते ब्रह्मांडी !
Wednesday, April 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment